तब्बल ४४ वर्षांनंतर भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान होणार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचा महापौर आणि उपमहापौरपदासाठी मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी होत असून प्रतिस्पर्धी पक्षाकडून कुणीही या पदांसाठी उमेदवारी अर्ज न भरल्याने ही निवडणूक बिनविरोध घोषित झाली आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाची औपचारिकता मंगळवारी पार पडणार आहे. तब्बल ४४ वर्षांनंतर भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान होणार आहे. या निवडणुकीत महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी हे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. विशेष म्हणजे महापौर निवडीच्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमहापौर एकनाथ शिंदे हे स्वत: उपस्थित राहून याचि देही याची डोळा पाहून या क्षणाचे साक्षीदार होणार आहेत.
मुंबई महापालिकेत भाजपचे सर्वांधिक म्हणजे ८९ नगरसेवक निवडून आले असून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे २९ अधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ अशाप्रकारे ३३ नगरसेक आहेत. त्यामुळे भाजप शिवसेना महायुतीचे संख्याबळ हे १२२ एवढे होत आहे. महायुतीच्यावतीने महापौरपदासाठी भाजप नगरसेविका रितू तावडे आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेेचे संजय घाडी यांनी आपले उमेदवारी अर्ज महापालिका सचिव यांना सादर केले. परंतु उबाठाच्यावतीने कुणीही आपले अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
या निवडणुकीची प्रक्रिया ही केवळ औपचारिकता राहणार असून पिठासीन अधिकारी म्हणून डॉ भूषण गगराणी हे काम पाहणार आहेत. यावेळी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महापालिका सभागृहातील प्रेक्षागॅलरी बसून ही निवड प्रक्रिया न्याहाळणार आहेत.
महापौर निवडीनंतर होणार नाही आनंदोत्स्व
महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीनंतर महापालिका मुख्यालयाबाहेर ढोलताशे आणि फटाक्यांची आतषबाजी केली होती, तसेच कार्यकर्ते नाचत गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा करत असतो. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महापौर तसेच उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष तसेच आनंदोत्सव केला जाणार नाही. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या निधनामुळे अत्यंत साधेपणाने नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचे स्वागत केले जाणार असल्याचे भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.







