Wednesday, February 11, 2026

मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करणार

मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करणार

उपमहापौर संजय घाडी यांची घोषणा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई शहरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्यास प्लास्टिकचा बेसुमार वापर कारणीभूत आहे . पर्यावरणाची हानी करण्यात प्रमुख घटक ठरलेल्या प्लास्टिकवर राज्य सरकारने मागील मार्च २०१८ पासून बंदी लागू केली. मुंबईतील बहुतांश भागात प्लास्टिकबंदी परिणामकारक ठरली आहे. मात्र ही बंदी १०० टक्के अंमलात आली नसल्याने ठिकठिकाणी जाणवते. छुप्या पध्दतीने काही प्रमाणात प्लास्टिकचा वापर अजूनही सुरुच आहे. प्लास्टिक बंदीची परिणामकारकता वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्यातील त्रुटी शोधून दंडात्मक कारवाईची तीव्रता वाढविण्याची गरज असल्याचे सांगत नवनिर्वाचित उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलली जावीत असेही पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेत उपमहापौर पदी निवड झाल्यानंतर संजय घाडी यांनी महापालिका सभागृहात भाषण करताना तसेच बृहन्मुंबई महानगर पालिका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित सत्कारानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी प्लास्टिक मुक्तीचा निर्धार व्यक्त केला.मुंबईतील करदात्या नागरीकांना सुरळीत पाणी पुरवठा करणे, मुंबईमध्ये स्वच्छता राखणे, मलनिःसारण व्यवस्था पाहणे, आरोग्य सेवा पुरविणे, रस्ते व वाहतूक ह्यांचे नियोजन करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, शैक्षणिक सुविधा देणे इत्यादी आवश्यक नागरी सुविधा सुरळीत मिळतील यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे मी नियमित पाठपुरावा करेन.,असे त्यांनी स्पष्ट केले.

शाळांमधील मुलांची गळती थांबवणार

शहराच्या नागरिकांना विविध नागरी सुविधा पुरवितांना वित्तव्यवस्थेवर ताण येणार नाही अशारितीने या विकास नियोजन आराखडयाची अंमलबजावणी सन २०३४ पर्यंत महापालिका प्रशासनाने काटेकोरपणे करावी. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने, शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ह्याकरिता महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याच्यादृष्टीने व पटसंख्येमध्ये वाढ होण्याच्यादृष्टीने प्रशासनाने नेटाने प्रयत्न केला जाईल,असेही स्पष्ट केले.

भटक्या कुत्र्यांच्या उत्पत्तींवर मर्यादा

शहरातील भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना होणारा उपद्रव टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करुन भटक्या कुत्र्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने निवारा केंद्र उभारावीत. तसेच, भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून त्यांच्या वाढत्या उत्पत्तीवर मर्यादा आणण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.,अशा सूचना करतानाच आपण यासाठी प्रयत्नशील असू असेही स्पष्ट केले.

स्त्रीभ्रूण हत्येस बळी पडू नका

"मुलगी वाचवा, मुलगी शिकवा" असा संदेश आपण सर्वत्र ऐकतो, पण तरीही समाजात स्त्रीभ्रुण हत्या है एक भीषण वास्तव आहे. गर्भजल चिकित्सा करुन जगामध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलींचा श्वास रोखू पाहणाऱ्या स्त्रीभ्रुण हत्या पूर्णपणे थांबविण्याची काळाची गरज आहे. आपल्या देशातील पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आजही कुटुंब, समाज घडवणारी स्त्रीच आहे. त्यामुळे तीचे अस्तित्व अबाधित ठेवण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे. ह्याकरिता गर्भजल चिकित्सा करुन स्त्रीभ्रूण हत्येस किंवा कोणत्याही अपप्रवृत्तीस बळी पडू नये असे असेही आवाहन त्यांनी केले.

अवयव दानाचे महत्व रुजवा

अवयवदान ही काळाची गरज आहे. जनजागृतीअभावी अवयवदात्यांचे प्रमाण अत्यल्प असून, अवयवदानामुळे जीवनदान मिळू शकते ही बाब जनमानसांमध्ये रुजविण्याची आवश्यकता आहे. तरी, महानगरपालिका प्रशासनाने आगामी वर्षात ही संकल्पना सर्वसामान्यांमध्ये रुजविण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी. तसेच मुंबईतील दुरावस्थेतील व अपुऱ्या सोयी-सुविधा असलेल्या स्मशानभूमी / दफनभूमींची तातडीने दुरुस्ती करुन तेथे आवश्यक त्या सेवा-सुविधा पुरविण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.

समुद्राचे पाणी खारे करण्याऐवजी धरण बांधा

आज शहरातील फेरीवाल्यांबरोबरच पार्किंगकरिता मोठ्या प्रमाणावर जागा व्यापली जात आहे. स्वतंत्र पार्किंग झोन ही काळाची गरज आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. बेस्ट, मेट्रो, मोनो, रेल्वे लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय एकमेकांशी जोडणे महत्वाचे ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याऐवजी मुंबई शहराला अधिक पाणीपुरवठा व्हावा ह्यासाठी प्रशासनाने नवीन धरणांची निर्मिती करून पाणीपुरवठ्याचे नियोजन कराये. तसेच, पाण्याची गळती आणि चोरी रोखण्याकरिता प्रशासनाने कठोर उपाययोजना करावी अशाप्रकारच्या सूचना केल्या आहेत.

झाडे मारण्यांवर कारवाई करा

मुंबईतील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आज वृक्षसंवर्धनाची नितांत गरज आहे. शहरात अस्तित्वात असलेली झाडे व वृक्षांची निगा राखणे व त्यांचे यथोचित संवर्धन करणे गरजेचे झाले असून, त्यांची हानी टाळण्यासाठी व ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी महानगरपालिकेने स्वतः वृक्ष प्राधिकरण व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने विशेष योजना कार्यान्वित करावी व मुंबईत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच काही ठिकाणी झाडे जाणीवपूर्वक मारण्याचे प्रकार घडत आहेत त्यांच्यावरही कडक कारवाई करावी अशीही विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे .

Comments
Add Comment