मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत तर्कवितर्क न लढवता, सखोल चौकशी पूर्ण होऊ द्यावी. कोणीही या दुर्दैवी घटनेचे राजकारण करू नये, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. या अपघाताबाबत कोणाकडे काही पुरावे किंवा मुद्दे असतील, तर त्यांनी ते संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या संशयावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, रोहित पवार यांनी काय वक्तव्य केले, हे मी थेट ऐकले नसले तरी त्यांनी काही प्रेझेंटेशन केले असल्याची माहिती आहे. विविध माध्यमे व नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकाच त्यांनी मांडल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अजित पवार हे महाराष्ट्राचे लाडके व वरिष्ठ नेतृत्व होते. त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण, सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, ही मागणी रास्त असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मीच सर्वप्रथम केंद्र सरकारला पत्र लिहून योग्य चौकशीची मागणी केली होती. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी समिती स्थापन केल्याचे पत्रही पाठवले असून सध्या तपास सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
चौकशी पूर्ण होण्यापूर्वी तर्कवितर्क मांडल्यास लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, असे सांगत त्यांनी भारतीय तपास यंत्रणांवर अविश्वास दाखवू नये, असे आवाहन केले. देशातील डीजी एव्हिएशन सेफ्टी हे सर्वोच्च कार्यालय असून आतापर्यंतच्या सर्व विमान अपघातांची चौकशी त्यांनीच केली आहे. याशिवाय सीआयडीचा समांतर तपास सुरू असून डीजीसीएचीही चौकशी सुरू आहे. अपघातग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्स सापडला आहे. शिवाय विमानाचे आवश्यक भाग जप्त करण्यात आले असून पायलट व एटीसीमधील संवाद डिजिटाईज स्वरूपात उपलब्ध आहे. अपघातस्थळावरील नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
देशातील तपास यंत्रणांवर शंका नको - फडणवीस
- भारताच्या तपास यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून अनेक देशांकडून भारतीय अधिकाऱ्यांना चौकशीसाठी निमंत्रित केले जाते. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याचे कारण नाही. भावनेच्या भरात काही विधाने झाली असतील; मात्र देशाच्या यंत्रणांवर शंका घेऊ नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूचे राजकारण करू नये, असे आवाहन करत मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्या अपघाती निधनाचे सत्य बाहेर यावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे आणि ते निश्चितपणे समोर येईल, असा मला विश्वास आहे. कोणाकडे काही मुद्दे किंवा शंका असतील, तर त्यांनी ते डीजी सेफ्टीकडे पाठवावेत. शंका व्यक्त करणे चुकीचे नाही; मात्र त्याचा राजकीय हेतूने वापर होऊ नये, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.







