Wednesday, February 11, 2026

Devendra Fadanvis : 'अस्सल मराठी चेहरा आणि दांडगा अनुभव'; रितू तावडेंच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; बाळासाहेबांना ज्या प्रकारचं...

Devendra Fadanvis : 'अस्सल मराठी चेहरा आणि दांडगा अनुभव'; रितू तावडेंच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; बाळासाहेबांना ज्या प्रकारचं...

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सर्वोच्च पदी अखेर भाजपच्या रितू तावडे विराजमान झाल्या आहेत. आज त्यांनी पालिकेच्या महापौर पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे (शिंदे गट) संजय घाडी यांनीही उपमहापौर म्हणून आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांच्याकडे कार्यभार सोपवला. महापालिका सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजीने वातावरण तापलेले असतानाच हा पदग्रहण सोहळा पार पडला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थिती लावली होती. महायुतीच्या नेत्यांनी रितू तावडे आणि संजय घाडी यांचे अभिनंदन करत आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुंबईला मिळाला 'अस्सल मराठी चेहरा' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "नवनियुक्त महापौर, उपमहापौर आणि सर्व पदाधिकारी मिळून मुंबई महापालिकेला एक नवी प्रगतीशील दिशा देतील. सामान्य मुंबईकरांनी जे विश्वासाने महायुतीला निवडून दिले आहे, त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचे काम ही नवी टीम करेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे." "महापौर रितू तावडे यांच्या रूपाने मुंबईला एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा मिळाला आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले. शिवसेना-भाजप महायुतीचे हे यश मुंबईकरांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. पदग्रहण सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, निवडणूक काळात मी आणि एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांकडे 'लोकाभिमुख' आणि 'पारदर्शी' प्रशासनासाठी मते मागितली होती. जनतेने दिलेल्या प्रतिसादानुसारच आज महायुतीचे दोन्ही शिलेदार पदावर विराजमान झाले आहेत. रितू तावडे यांनी यापूर्वीही मुंबईकरांच्या समस्यांवर नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या विकासासाठी निश्चितपणे होईल. राज्य सरकारने मुंबईच्या विकासाचा जो भव्य कार्यक्रम हाती घेतला आहे, तो आता महानगरपालिकेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे राबवला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिका पुन्हा एकदा सामान्य जनतेसाठी काम करणारी संस्था ठरेल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

बाळासाहेबांना अपेक्षित असं प्रशासन देणार 

उपमहापौर संजय घाडी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. "संजय घाडी हे शिवसेनेचे अत्यंत जुने, जाणते आणि अनुभवी शिवसैनिक आहेत. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा मुंबईच्या कारभाराला गती देण्यासाठी निश्चितपणे होईल," असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष जवळ येत आहे. याचे औचित्य साधून मुख्यमंत्री म्हणाले की, "बाळासाहेबांना ज्या प्रकारचं लोकाभिमुख आणि मुंबईकरांच्या हिताचं प्रशासन अपेक्षित होतं, अगदी तसंच प्रशासन या महापालिकेच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न असेल." नवीन महापौर आणि उपमहापौर ही जोडी बाळासाहेबांच्या विचाराने पालिकेचा गाडा हाकतील, असेही त्यांनी नमूद केले. "मी आणि एकनाथ शिंदे पूर्ण ताकदीने या टीमच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही जी 'नवी मुंबई' घडवण्याचे स्वप्न पाहत आहोत, त्या विकासाला गती देण्याचे काम महापालिका पदाधिकारी करतील," असे आश्वासन त्यांनी दिले. सामान्य मुंबईकरांच्या प्रलंबित समस्या आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आणि महानगरपालिका आता हातात हात घालून काम करणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा