मुंबई: मुंबईच्या महापौरपदाची स्वप्ने आजवर जाधव कुटुंबाला अनेकदा दाखवली गेली. अनुसूचित जाती प्रवर्ग आल्याने यशवंत जाधव आणि त्यानंतर एकदा एस सी महिला प्रवर्ग आल्याने यामिनी जाधव यांना महापौरपदाची आस लागली होती. परंतु शिवसेनेने दुसऱ्याच नगरसेवकाला उमेदवार देत जाधव कुटुंबांची स्वप्ने उधळून लावली. परंतु यावेळी उपमहापौरपदासाठी यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा होती पण तिथे जाधव यांच्याऐवजी संजय घाडी यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे उपमहापौरपदही जाधव कुटुंबाला मिळाले नाही. त्यामुळे महापौरपदापाठोपाठ आता उपमहापौरपदानेही यामिनी जाधव यांना हुलकावणी दिल्याचे दिसून आले आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेनेचे २९ नगरसेवक आणि भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आल्याने महापौरपदासाठी भाजपच्यावतीने रितू तावडे आणि शिवसेनेच्यावतीने संजय घाडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु शिवसेनेच्यावतीने उपमहापौरपदासाठी यामिनी जाधव आणि तृष्णा विश्वासराव यांच्या नावाची चर्चा होती. परंतु यामिनी जाधव यांचे नाव उपमहापौरपदासाठी अग्रस्थानी होते . त्यामुळे पुन्हा एकदा जाधव कुटुंबावर अन्याय झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
यापूर्वी सन २००२मध्ये अनूसुचित जातीच्या महापौरपदाचे आरक्षण पडल्यानंतर यशवंत जाधव यांचे नाव होते, परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महादेव देवळे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे यशवंत जाधव यांचे नाव मागे पडले. त्यानंतर सन २०१२ ते २०१७ या कालावधीमध्ये सुरुवातीला महिला एस सी प्रवर्गाकरता आरक्षण पडल्यानंतर यामिनी जाधव आणि स्नेहल आंबेकर यांची नावे चर्चेत होती. पण यामिनी जाधव यांना न देता तत्कालिन शिवसेनेने स्नेहल आंबेकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे जाधव कुटुंबाचे दुसऱ्यांदा महापौर होण्याचे स्वप्न भंग पावले. त्यानंतर पुन्हा एकदा सन २०१९मध्ये सर्वसाधारण प्रवर्ग आल्याने तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष म्हणून यशवंत जाधव यांचे नाव चर्चेत होते. परंतु शेवटच्या क्षणाला किशोरी पेडणेकर यांनी बाजी मारली आणि त्या महापौर बनल्या. त्यामुळे तिसऱ्यांदा जाधव कुटुंबात जाणारे महापौर पद लांबणीवर पडले. त्यातच आता महापौर नाही तर उपमहापौर पद मिळेल अशी आशा असतानाच शिवसेनेने त्यांचा पत्ता कापून संजय घाडी यांना उमेदवारी दिल्यामुळे महापौर पदानंतर आता उपमहापौर पदही त्यांच्या घरी जावू शकलेले नाही, हे दिसून आले आहे. यामिनी जाधव हे आक्रमक व्यक्तिमत्व असल्याने तसेच माजी आमदार असल्यामुळे सभागृहात त्यांची आवश्यकता लक्षात घेवून त्यांना उपमहापौर दिले नसल्याचे बोलले जात आहे.






