Tuesday, February 10, 2026

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच सुनेत्रा पवार यांचं पहिलं ट्विट; म्हणाल्या...

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच सुनेत्रा पवार यांचं पहिलं ट्विट; म्हणाल्या...

मुंबई: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. मात्र आज म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी रोजी त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी पहिलं ट्विट करून महाराष्ट्राला एक वचन दिलं आहे.

दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन, असे वचन सुनेत्रा पवार यांनी या ट्विटमधून दिलं आहे.

काय म्हणाल्या सुनेत्रा पवार ?

आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.

दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन, असे ट्वीट सुनेत्रा पवार यांनी केले आहे.

सुनेत्रा पवारांना दिल्लीचं निमंत्रण:

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले असून, आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? या चर्चेने जोर धरला आहे. याच संदर्भात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत केवळ राज्याच्या राजकीय परिस्थितीवरच नव्हे, तर सुनेत्रा पवार यांच्या नवीन जबाबदारीवरही सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना अमित शहा यांनी "काही लोकांना यात केवळ राजकारण दिसत आहे," असे विधान केल्याचे समोर आले आहे. या विधानामुळे भाजपचा दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाला छुपा विरोध आहे की काय? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांची विचारपूस केली. अजित पवार यांचे सर्व अंत्यविधी आणि धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना दिल्लीला घेऊन या, असे खास निमंत्रणच या दोन्ही बड्या नेत्यांनी पटेल यांना दिले आहे. या आगामी दिल्ली दौऱ्यात राष्ट्रवादीच्या भविष्यातील वाटचालीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी विलिनीकरणावर स्पष्टच सांगितलं:

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या सर्व वावड्या असल्याचे सांगत विलीनीकरणाच्या शक्यता पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. "विलीनीकरणाबाबत अजितदादांची माझ्याशी कधीही चर्चा झाली नाही आणि अशा कोणत्याही हालचाली सुरू नाहीत," असे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले आहे. अजित पवार यांच्या मनातील रणनीतीचा उलगडा करताना पटेल म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मते विभागली जाऊ नयेत, यासाठी अजितदादा आग्रही होते. "आपण सर्व वेगवेगळे लढलो तर मतांचे विभाजन होईल आणि त्याचा फटका बसेल. त्यामुळे शरद पवार गटाशी केवळ निवडणूक समन्वय साधण्याबाबत दादांनी भूमिका मांडली होती," अशी माहिती पटेल यांनी दिली. थोडक्यात सांगायचे तर, दोन्ही पक्षांचे विलीनीकरण नव्हे, तर केवळ निवडणुकांपुरता समन्वय साधण्याचा अजितदादांचा विचार होता, असे आता स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment