पालघर: भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा नेमबाज संभाजी शिवाजी पाटील याचा वयाच्या २७ व्या अपघाती मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ संभाजी पाटीलचा भीषण कार अपघात झाला. सोमवारी सकाळी १० ते ११ च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात फॉर्च्युनर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
संभाजी पाटील पुण्याहून गुजरातच्या दिशेने प्रशिक्षणासाठी जात होता. पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्वेश गावाजवळ, त्याची भरधाव फॉर्च्युनर कार एका उभ्या असलेल्या अवजड हयावा ट्रकला पाठीमागून जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढचा भाग ट्रकच्या खाली घुसला आणि गाडीचा चेंदामेंदा झाला.
नेमकं घडलं काय?
अपघातात संभाजी पाटील याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र प्रणय आणि प्रशांत चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी मुंढे करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा उभ्या ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असलेला संभाजी पाटील बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याने नेमबाजीमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके पटकावली होती.
संभाजी पाटील नेमबाजीतील कारकीर्द
२०१६- कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत (गबाना) सुवर्णपदक. २०१७ - कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत सांघिक रौप्य पदक. २०१८-२० - ऑल इंडिया रेल्वे आणि मध्य रेल्वे नेमबाजी स्पर्धांमध्ये सातत्याने सुवर्णपदके. अलीकडेच त्याची पुन्हा एकदा राष्ट्रीय नेमबाज म्हणून निवड झाली होती.







