छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र मिळणार, प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी मंत्री शेलार फान्सला जाणार

मुंबई : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार हे आज रात्री महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शिष्टमंडळासह फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत.


दि.११ ते १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ते पॅरिस येथे होणाऱ्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उभारण्यात आलेल्या भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला यावेळी एका विशेष कार्यक्रमात ॲड. आशिष शेलार हे अभिवादन करणार आहेत. सुमारे दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गतवर्षी दि.११ जुलै २०२५ रोजी, युनेस्कोच्या ४७व्या अधिवेशनात, 'मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया' या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पॅरिस येथे स्वीकारणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाशी लढून उभारलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणाकरता, सुरक्षित शासनव्यवस्था आणि लोककल्याण, यासाठी साकारलेली गड-किल्ल्यांची साखळी हा भारतीय इतिहासातील अद्वितीय लष्करी व राज्यकारभाराचा नमुना मानला जातो. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी असा १२ किल्ल्यांचा समूह आज 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून संपूर्ण जगासमोर उभा राहिला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०२५ मध्ये अॅड. शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचे चार सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर तांत्रिक आणि धोरणात्मक मांडणी करून या मानांकनासाठी सादरीकरण आणि युक्तीवाद करून आले होते. आता प्रत्यक्ष मानांकन-पत्र स्वीकारण्याच्या व ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याच्या या दौऱ्याला शिवरायांच्या पराक्रमाचा आणि मराठा साम्राज्याच्या वारशाचा जागतिक सन्मान असा गौरवशाली आयाम लाभत आहे. या दौऱ्यात अॅड. आशिष शेलार युनेस्कोचे महासंचालक, संबंधित तज्ञ व भारताचे युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी श्री. विशाल शर्मा यांच्यासमवेत स्वतंत्र बैठकींमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्रातील इतर प्रस्तावित वारसास्थळांबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत.


कोकणातील कातळशिल्पे, महाराष्ट्रातील सागरी किल्ले तसेच अमूर्त सांस्कृतिक वारशांतर्गत पंढरपूर वारी, गणेशोत्सव व दहीहंडी यांना जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळविण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांना या भेटीत नवे बळ मिळेल, असा विश्वास ॲड. आशष शेलार यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच वांद्रे, मुंबई येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘महाराष्ट्र वस्तुसंग्रहालया’साठी पॅरिसमधील नामांकित संग्रहालये, त्यांचे व्यवस्थापन, प्रदर्शनरचना, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी बाबींचा अभ्यास करून त्या धर्तीवर येथील संग्रहालय अधिक समृद्ध करण्यासाठी हे शिष्टमंडळ या दौऱ्यात पाहाणी व अभ्यास करणार आहे.


दरम्यान, भारताचे संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा युनेस्को मुख्यालयाला भेट दिला असून, दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनानिमित्त या पुतळ्याची स्थापना पॅरिसमध्ये युनेस्को मुख्यालयात झाली आहे. सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि शिक्षणाद्वारे सक्षमीकरण यांची डॉ. आंबेडकरांनी दिलेली शिकवण ही युनेस्कोच्या मुलभूत ध्येयाशी सुसंगत आहे. पॅरीसमधील त्यांच्या या स्मारकाला विशेष कार्यक्रम व मानवंदना सोहळ्यात ॲड.आशिष शेलार अभिवादन करणार आहेत. डॉ. बाबासाहेबांना पॅरीसमध्ये केलेले हे अभिवादन भारतीय लोकशाहीच्या मूल्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नव्याने अधोरेखित करणारे पाऊल आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. या दौऱ्यामुळे राज्याचा सांस्कृतिक वारसा, पर्यटनक्षमता आणि जागतिक पातळीवरील प्रतिमा अधिक भक्कम होणार आहे.

Comments
Add Comment

जमीन महसूल सुनावणीची नोटीस आता ईमेलद्वारे पाठवणार

जमीन महसूल संहितेत मोठा बदल; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता मुंबई :

Dombivali news : स्वप्नांचा चक्काचूर! बारावीचा पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला, धावत्या ट्रेनमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

डोंबिवली : बारावीच्या परीक्षेचा पहिलाच दिवस एका कुटुंबासाठी कधीही भरून न येणारे दु:ख घेऊन आला. डोंबिवली येथील

Cabinet Decision: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स - राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश

मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांच्या

Devendra Fadnavis: विलिनिकरण हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवारांची स्वप्नपूर्ती करणारे अनेक निर्णय मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या

Nitesh Rane: सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला हिंदू - मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

सरसंघचालकांच्या उद्बोधनावर ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला दिले प्रत्युत्तर मुंबई : “सलमान खान हा उद्धव

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच दादांच्या प्रतिमेला अभिवादन करताना सुनेत्रा पवार भावूक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज