मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबीयांनी आपला दबदबा कायम ठेवत विजय मिळवला. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, तानाजी सावंत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या कुटुंबीयांनी गड राखत राजकीय वारसा पुढे नेला, तर काही ठिकाणी मतदारांनी घराणेशाहीला स्पष्ट नकार दिल्याचेही चित्र पाहायला मिळाले.
आंबेगाव मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी पारगाव जरकवाडी गटातून २ हजार १३० मतांची निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला. पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची कन्या रूपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवला. विशेष म्हणजे, पुरंदर तालुक्यातील दोन्ही पंचायत समिती सदस्यही राष्ट्रवादी काँग्रेसचेच निवडून आल्याने तालुक्यावर पक्षाची पकड अधिक मजबूत झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील हाय-व्होल्टेज लढतींमध्येही प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबीयांनी बाजी मारली आहे. माढा तालुक्यातील मानेगाव गटातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांनी भाजपच्या तिकिटावर ६ हजार ८०० मतांच्या विक्रमी मताधिक्याने प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. याच जिल्ह्यात भाजप नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी दहिगाव गटातून विजय मिळवत राजकीय क्षेत्रात यशस्वी प्रवेश केला आहे.
दुसरीकडे, रायगड जिल्ह्यात आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला.
परभणीत घराणेशाही नाकारली:
दरम्यान, परभणी जिल्ह्यात मतदारांनी घराणेशाहीला स्पष्ट नकार दिल्याचे चित्र समोर आले आहे. माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, त्यांच्या कुटुंबातील पाच उमेदवारांपैकी केवळ एकालाच विजय मिळवता आला आहे. वरपुडकर यांचा मुलगा, मुलगी, सून आणि एक पुतणा या चौघांना पराभवाला सामोरे जावे लागले असून, या निकालाने जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.







