मुंबई : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक झाली होती. या निकालात कोणता पक्ष बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. साधारण चार ते पाच तासांमध्ये या निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या १२ जिल्हापरिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी सरासरी ६८.२८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकांचे वर्णन मिनी मंत्रालय असे करण्यात येते. ग्रामीण भागातील विकासकामे आणि निधीवाटपाच्यादृष्टीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा महत्त्वाच्या असतात. त्यामुळे याठिकाणी आता कोणाची सत्ता येणार, हे आज स्पष्ट होईल.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोण बाजी मारणार, हे बघावे लागेल. याआधी झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप राज्यातील सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. त्यामागोमाग एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. पण, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीचा प्रचार थंडावला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर प्रमुख नेत्यांनी प्रचारसभा घेणे टाळले होते. त्यामुळे फारसा प्रचार न झालेल्या या निवडणुकांचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







