Sunday, March 22, 2026

मिनी विधानसभेतही भाजप-महायुतीचा डंका

मिनी विधानसभेतही भाजप-महायुतीचा डंका

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दमदार कामगिरी; भाजप क्रमांक एकचा पक्ष, एकनाथ शिंदे यांना मिळाले वाढदिवसाचे गिफ्ट, राष्ट्रवादीनेही गड राखले

मुंबई : नगरपालिका, महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजप-शिवसेना महायुतीने चमकदार कामगिरी करीत दमदार विजय मिळवला आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. विशेष म्हणजे या निवडणुकीत उबाठा गटाला जिल्हा परिषदेत एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे आजवरचा हा त्यांचा सर्वात मानहानीकारक पराभव ठरला असून, ग्रामीण भागातील जनतेने ठाकरेंच्या नेतृत्त्वाला स्पष्ट नाकारले, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी या निवडणुका पार पडल्या. महापालिका निवडणुकीनंतर घसरत चाललेल्या मतदानाच्या टक्केवारीबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच खेड्यापाड्यांतून म्हातारे-कोतारे, आयाबाया आणि तरुणाई मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याने आश्वासक चित्र दिसले. या निवडणुकीत तब्बल ६८.२८ टक्के मतदान झाले. त्यामुळे लढती अटीतटीच्या होतील, असे तर्क लावले जातात असताना, ग्रामीण मतदारांनी भाजप महायुतीला स्पष्ट कौल दिला.

उबाठा आणि काँग्रेसला जिल्हा परिषदेत एकही जागा जिंकता आली नाही. तर, पंचायत समितीतही त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. या निवडणुकीत भाजप राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला असून, भाजपची ग्रामीण भागातील पकड किती खोलवर रुजली आहे, हे स्पष्ट झाले आहे. भाजपनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सरस कामगिरी केली आहे.

राज्यातील १२ जिल्हा परिषदांपैकी आठ जिल्हा परिषदांवर भाजपने वर्चस्व मिळवले. शिवसेनेला तीन जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जिल्हा परिषदेत यश मिळाले आहे. काँग्रेसने कोल्हापूर आणि लातूरमध्ये चांगली कामगिरी केली असली, तरी त्यांना सत्तेसमीप जाण्याइतके संख्याबळ मिळाले नाही. दुसरीकडे उबाठा गटाला जिल्हा परिषदेत खातेही उघडता आलेले नाही. या पराभवामागे उबाठा गटाच्या वरिष्ठ नेतृत्वाची निष्क्रियता कारणीभूत ठरल्याचे मत व्यक्त केले जात आहे. उबाठाच्या एकाही बड्या नेत्याने या निवडणुकीत सक्रिय प्रचार केला नाही किंवा कार्यकर्त्यांना बळ दिले नाही. याचाच परिणाम निकालात दिसून आल्याचा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

जिल्हा परिषदेत कोणाला किती जागा?

जिल्हा परिषद एकूण भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस उबाठा शरद पवार मनसे इतर १) छत्रपती संभाजी नगर,62,23,19,2,1,8,1,0,7 २) धाराशिव,55,12,12,5,2,5,3,0,2 ३) कोल्हापूर,67,11,11,10,13,2,0,0,5 ४) लातूर,58,17,1,10,18,1,1,0,3 ५) परभणी,54,17,3,6,3,2,0,0,0 ६) पुणे,73,8,5,43,0,7,1,0,0 ७) रायगड,59,10,14,16,1,5,0,0,5 ८) रत्नागिरी,55,1,26,2,0,5,0,0,2 ९) सांगली,61,17,5,5,8,1,16,0,3 १०) सातारा,64,32,10,17,0,0,1,0,0 ११) सिंधुदुर्ग,50,19,7,0,0,0,0,0,1 १२) सोलापूर,68,39,6,10,0,0,0,0,3

पंचायत समित्यांमध्ये भाजपचा दबदबा

महाराष्ट्रातील पंचायत समित्यांच्या निवडणुकांत भाजपने जोरदार मुसंडी मारत १२५ पैकी ४५ ठिकाणी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे पारंपरिक बालेकिल्ले भेदण्यात भाजपला यश आले असून, ग्रामीण राजकारणातील सत्तासमीकरणे बदलत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत शिवसेनेला २४, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २० पंचायत समितीच्या चाव्या मिळाल्या. पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवार गट एकत्र लढले होते, तर काही ठिकाणी स्वतंत्र. शरद पवार यांच्या पक्षाला पंचायत समित्यांमध्ये केवळ ८ ठिकाणी विजय मिळाल्याने त्यांची ग्रामीण भागातील पकड ढिली होत असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेसला काँग्रेसला केवळ ८, तर उबाठा गटाला ५ ठिकाणी यश मिळाले.

पंचायत समित्यांचे चित्र

एकूण - १२५ भाजप - ४५ शिवसेना - २४ राष्ट्रवादी - २० काँग्रेस - ८ शरद पवार - ८ उबाठा - ५ इतर - १

सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त 'राणे ब्रँड'

- संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ‘राणे ब्रँड’ची हवा दिसून आली. या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता अबाधित राखली असून, उबाठा गटाला कोकणी जनतेने जवळपास नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

- या निकालातून मंत्री नितेश राणे यांचे तळकोकणातील राजकीय वर्चस्व ठळकपणे अधोरेखित झाले आहे. स्थानिक पातळीवरील प्रभावी संघटन, नियोजनबद्ध प्रचार आणि आक्रमक नेतृत्व याचा थेट फायदा महायुतीला झाल्याचे दिसून आले.

- निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे यांनी ग्रामीण विकासावर भर देण्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, “सत्तेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सर्वांगीण विकास केला जाईल. दरडोई साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे,” असे त्यांनी सांगितले.

- यावेळी त्यांनी बंडखोर उमेदवारांच्या मुद्द्यावरही भाष्य केले. “निवडून आलेले बंडखोर उमेदवार हे मूळ भाजपचेच आहेत. मात्र, कमळ चिन्हाच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याचा फटका महायुतीला बसला. ‘अदृश्य हातां’च्या माध्यमातून भाजपच्या उमेदवारांचा पराभव घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्या अदृश्य हातांना भविष्यात बाजूला केले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

Comments
Add Comment