मुंबईचा ‘रणजी’तील प्रवास थांबला!

मुंबई  : के.एल. राहुल आणि रवीचंद्रन स्मरण यांच्या दमदार खेळींच्या बळावर कर्नाटकने रणजी करंडक स्पर्धेत ४२ जेतेपदं नावावर असणाऱ्या मुंबईला ४ विकेट्सनी नमवले. या पराभवासह मुंबईचं यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले.


बीकेसी इथल्या शरद पवार क्रिकेट अकादमी इथे झालेल्या लढतीत, मुंबईचा पहिला डाव अवघ्या १२० धावांतच आटोपला. मुंबईचा कर्णधार शार्दूल ठाकूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. खेळपट्टी गोलंदाजांना सहाय्यक होती. कर्नाटकच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. सलामीवीर अखिल हेरवाडकरने ६० धावांची एकाकी झुंज दिली. मुंबईच्या सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. सर्फराझ खान दुखापतग्रस्त असल्याने या सामन्यात खेळू शकला नाही. अनुभवी अजिंक्य रहाणेने वैयक्तिक कारणास्तव रणजी करंडक स्पर्धेच्या उत्तरार्धात खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यशस्वी जैस्वाल (५), मुशीर खान (१), क्रायसिस मॅन म्हणून प्रसिद्ध सिद्धेश लाड (१२) धावा करू शकले. शम्स मुलानी, शार्दूल ठाकूर आणि तनुष कोटियन यांनाही मोठी खेळी करता आली नाही. सामन्याच्या पहिल्याच दिवशी झटपट बाद होणे मुंबईला चांगलेच महागात पडले. कर्नाटकतर्फे विदवत कावेरप्पा, प्रसिध कृष्णा आणि श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी ३ विकेट्स पटकावल्या.


कर्नाटकच्या फलंदाजांनाही धावांसाठी संघर्ष करावा लागला. मयांक अगरवालच्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर कर्नाटकने १७३ धावांची मजल मारत अल्प आघाडी मिळवली. के.एल.राहुलने २८ धावा करत मयांकला चांगली साथ दिली. या दोघांचा अपवाद वगळता कर्नाटकच्या बाकी फलंदाजांनी हाराकिरी केली. मुंबईतर्फे मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी ४ विकेट्स पटकावल्या.


मुंबईचे ३२५ धावांचे लक्ष्य


मुंबईने दुसऱ्या डावात पहिल्या डावातल्या चुका टाळत खेळ केला. मुंबईने दुसऱ्या डावात ३७७ धावा केल्या. यष्टीरक्षक फलंदाज आकाश आनंदने सर्वाधिक ७० धावा केल्या. मुशीर खान (४९), तनुष कोटियन (४८) आणि तुषार देशपांडे (४७) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केल्या. मुंबईने कर्नाटकसमोर ३२५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.


रवीचंद्रन स्मरणने डाव सावरला


या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकने मयांकर अगरवालला झटपट गमावले. देवदत्त पड्डीकल ३९ धावा करून बाद झाला. करुण नायर १३ धावा करून तंबूत परतला. मात्र के.एल.राहुलने एका बाजूने नांगर टाकून मॅरेथॉन खेळी साकारली. राहुलने १४ चौकार आणि एका षटकारासह १३० धावांची खेळी केली. राहुल बाद झाल्यानंतर रवीचंद्रन स्मरणने सूत्रे स्वीकारली. स्मरणने नाबाद ८३ तर विद्याधर पाटीलने ३१ धावांची खेळी केली.

Comments
Add Comment

Venezula Earthquake : फिफा वर्ल्ड कप सुरू असताना स्टार खेळाडूला मोठा धक्का ! भूकंपामध्ये पार्टनरचा..

Venezuela : व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपात अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

WI VS SL : वेस्ट इंडिजने रचला इतिहास ! टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील १४९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला

बार्बुडा: वेस्ट इंडिजच्या कामगिरीने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील

NZ VS ENG : न्यूझीलंड क्रिकेटला मोठा धक्का ! एकाच वेळी तीन दिग्गज खेळाडूंनी घेतली निवृत्ती

इंग्लंड खेळाडूंकडून मिळाला 'गार्ड ऑफ ऑनर' लंडन : टी-२० महिला वर्ल्ड कप २०२६ मध्ये शनिवारी (२७ जून) ला गविजेता

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाची विजयी घोडदौड कायम; मेस्सीचा नवा विक्रम

अर्लिंग्टन, टेक्सास : गतविजेत्या अर्जेंटिनाने जॉर्डनचा ३-१ असा पराभव करत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील गट फेरीचे

FIFA WORLDCUP 2026 : ऑस्ट्रिया आणि अल्जेरियाची बाद फेरीत धडक; इराण स्पर्धेतून बाहेर

कॅन्सस सिटी: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी रात्री झालेल्या एका चित्तथरारक सामन्यात ऑस्ट्रिया आणि अल्जेरिया

FIFA WORLDCUP 2026 : काँगोची ऐतिहासिक कामगिरी; उझबेकिस्तानचा पराभव करत बाद फेरीत प्रवेश

अटलांटा: योआने विसाच्या दोन शानदार गोलांच्या जोरावर काँगोने शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात उझबेकिस्तानचा