लाहोर: रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल, परंतु १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेत होणारा भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही. तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत आहे. मात्र आता पाकिस्तान माघार घेण्याच्या तयारीत आहे. किंबहुना आयसीसीने त्यांना माघार घेण्यास भाग पाडले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (८ फेब्रुवारी) गद्दाफी स्टेडियममध्ये पाकिस्तान सोबत झालेल्या बैठकीत आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी पीसीबीला (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) बहिष्काराचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. अशातच काल लाहौरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक जवळपास १३० मिनिटं चालली.
लाहौरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये बैठक:
लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यात बैठक पार पडली. नक्वी यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) चे प्रमुख अमिनुल इस्लाम बुलबुल यांचीही भेट घेतली.
पीसीबीने केल्या तीन मागण्या केल्या:
रविवारी लाहोरमध्ये आयसीसी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पीसीबीने तीन मागण्या केल्या आहेत. बांगलादेशला वाढीव भरपाई देण्यात यावी, टी-ट्वेंटी विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतरही बांगलादेशचे सहभाग शुल्क दिसलं जावं आणि भविष्यात आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्याचा अधिकार मिळाला, असं पीसीबीने बैठकीत मुद्दा मांडला आहे.
दरम्यान, पीसीबीचे प्रमुख मोहसीन नक्वी सोमवारी पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेऊन अंतिम निर्णय घेतील. दोन आठवड्यांतील ही त्यांची दुसरी अधिकृत बैठक असेल. १५ फेब्रुवारीची अंतिम तारीख जवळ येत असताना परिस्थितीचे गांभीर्य यावरून दिसून येते.
पाकिस्तान "यू-टर्न" घेईल:भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना पाकिस्तान "यू-टर्न" घेईल असे वाटते. मात्र तरीही पाकिस्तानने १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकला तर आयसीसीने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी असे आवाहन देखील गावस्कर यांनी केले आहे.







