मुंबई: समाज माध्यमावर प्रचंड फेमस असणाऱ्या शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून निवडणुकीला उभ्या होत्या. निर्मला नवले या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. आजवर त्यांचे अनेक रिल्स आणि व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. परंतु, यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली आहे. भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी निर्मला नवले यांना ३०० मतांनी पराभूत केले.
पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. निर्मला नवले या राजकारणी असल्या तरी इन्स्टाग्रामवर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. निर्मला नवले यांनी आयटी इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले आहे. काही वर्षांपूर्वी निर्मला नवले यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. तेव्हापासून त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली. उच्चशिक्षित आणि लोकप्रिय चेहरा म्हणून निर्मला नवले या कायम चर्चेत असायच्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत निर्मला नवले यांची जादू चालू शकली नाही.
दरम्यान पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण २९९ जागांपैकी ७३ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपचे २०, शिवसेनेचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे २७, ठाकरे गटाचे २ आणि शरद पवार गटाचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार पूर्णपणे थंडावला होता. पुण्यात एकही मोठी सभा झाली नव्हती. अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळताना दिसत आहे.







