सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. येथे चक्क ईव्हीएम मशीनवर जादूटोणा करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. ईव्हीएम मशीनखाली चक्क टाचण्या टोचलेले लिंबू आणि मिरची ठेवून जादूटोणा केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या वायरल झाले आहेत. ईव्हीएम मशीन खाली चक्क लिंबूला टाचण्या टोचून बिबा ठेवल्याने मतदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
या सर्व प्रकाराबाबत अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडले. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत एकूण ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात असून, सोमवारी निकाल जाहीर होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक जाहीर केली होती. सुरुवातीला ही निवडणूक ५ फेब्रुवारीला होणार होती; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाला आणि मतदानाची तारीख बदलण्यात आली. त्यानुसार, शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी, ९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.
धक्कादायक प्रकार आला समोर:
सोलापूर शहराला चिटकूनच दक्षिण सोलापूर तालुका आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे दक्षिण सोलापूर मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू होती. एक महिला मतदार मतदान करण्यासाठी केंद्रात गेली. मतदान करून बाहेर येत असतानाच त्या महिलेला अचानक चक्कर आली आणि ती जागीच कोसळली. शुद्धीवर आल्यानंतर त्या महिलेने ईव्हीएम मशीनच्या खाली लिंबू-मिरची आणि जादूटोण्याचे साहित्य पाहिल्याचे सांगितले.
निवडणूक आयोग काही कारवाई करणार का?
मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर जादुटोणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कृत्यात जे अधिकारी आणि उमेदवार सामील आहेत त्यांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अपक्ष संदीप राठोड यांनी केली आहे.
"लोकशाहीच्या पवित्र मंदिरात अशा प्रकारे जादूटोणा करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, हा प्रकार निंदनीय आहे," असेही राठोड यांनी यावेळी म्हटलं आहे.







