Sunday, February 8, 2026

Russia Knife Attack: रशियामध्ये चार भारतीय विद्यार्थ्यांसह अनेकांवर चाकू हल्ला; एक गंभीर जखमी

Russia Knife Attack: रशियामध्ये चार भारतीय विद्यार्थ्यांसह अनेकांवर चाकू हल्ला; एक गंभीर जखमी

रशिया: रशियन प्रजासत्ताक बाशकोर्तोस्तानमधील उफा येथील एका वैद्यकीय विद्यापीठात चाकू हल्ला झाला आहे. या हल्ल्यात चार भारतीय विद्यार्थ्यांसह अनेक जण जखमी झाले आहेत. भारतीय दूतावासाने शनिवारी रात्री (७ फेब्रुवारी २०२६) या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की सर्व जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती देताना भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, उफा येथे एक दुर्दैवी हल्ला झाला आहे, ज्यामध्ये चार भारतीय विद्यार्थी देखील जखमी झाले आहेत. दूतावासाने सांगितले की ते रशियामधील स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत आणि जखमी विद्यार्थ्यांना सर्व शक्य मदत करण्यासाठी काझानमधील भारतीय वाणिज्य दूतावासाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

नेमकं काय घडलं ?

पीटीआयच्या वृत्तानुसार, शनिवारी (७ फेब्रुवारी २०२६) एका १५ वर्षीय मुलाने उफा येथील स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये प्रवेश केला. आरोपी थेट वसतिगृहात गेला आणि तिथे असलेल्या विद्यार्थ्यांवर अचानक चाकूने हल्ला केला. हा हल्ला इतका अचानक होता की विद्यार्थी चकित झाले. रशियन गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आरोपीने अनेक विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने दोन पोलिस अधिकाऱ्यांवरही हल्ला केला. अटकेला प्रतिकार करताना आरोपी स्वतः जखमी झाला. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या मेजर जनरल इरिना वोल्क म्हणाल्या की, आरोपीला पकडताना पोलिस अधिकारी जखमी झाले आणि हल्लेखोराने स्वतःलाही जखमी केले.

एकाची प्रकृती गंभीर:

रशियन आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यात जखमी झालेल्या चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. किशोरवयीन हल्लेखोरालाही बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्याची प्रकृतीही गंभीर आहे.

तपासात समोर आली महत्त्वाची माहिती:

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, आरोपी हा बंदी घातलेल्या नव-नाझी संघटनेशी संबंधित होता. हल्ल्यादरम्यान तो राष्ट्रवादाच्या घोषणा देत होता. तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे आणि त्यांच्याकडून प्रत्येक पैलूची तपासणी सुरु झाली आहे. या घटनेनंतर विद्यापीठ आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भारतीय दूतावासाने सांगितले आहे की ते या सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा ही त्यांची प्राथमिकता आहे.

Comments
Add Comment