मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या घरच्या मैदानावर अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करत दिमाखदार सुरुवात केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने १० चौकार आणि ४ षटकार मारत ८४ धावांची झंझावाती खेळी दाखवली. तर मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने १६१ धावांचा बचाव यशस्वीपणे केला.
भारताने दिलेल्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरुवात खूपच खराब झाली. मोहम्मद सिराज व अर्शदीप सिंग यांनी सलामीवीरांना दुसऱ्या व तिसऱ्या षटकात माघारी धाडले. तर कर्णधार मोनांक पटेलला अर्शदीपने शून्यावर बाद केले. यानंतर मिलिंद कुमार व संजय कृष्णमूर्ती यांनी चांगली फलंदाजी करत ५८ धावांची भागीदारी रचली. पण भारताच्या फिरकीपटूंनी मिलिंदला ३४ धावांवर, तर संजयला ३७ धावांवर झेलबाद करत अमेरिकेच्या आशांवर पाणी फेरले.
मिलिंद बाद झाल्यानंतर संजयने संघाचा डाव सावरला होता. पण अक्षर पटेलने त्याला माघारी धाडले. अक्षरने १६व्या षटकात सलग दोन विकेट्स घेत अमेरिकेला बॅकफूटवर टाकले. हरमीत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात गोल्डन डकवर झेलबाद झाला.
तत्पूर्वी या सामन्यात अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला. भारताकडून इशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. पण दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर अभिषेक शर्माला शून्यावरच अली खानने बाद केले.
त्यानंतर तिलक वर्मा आणि इशान किशनने डाव पुढे नेला. मात्र ६ वे षटक भारतीय संघाला धक्का देणारे ठरले. या षटकात शेंडली वॅन शाल्क्विकने तीन विकेट्स घेतल्या. त्याने इशान किशनला २० धावांवर, तिलक वर्माला २५ धावांवर आणि शिवम दुबेला शून्यावरच बाद केले.
यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवला रिंकू सिंग साथ देत होता. पण रिंकूलाही फार काळ मोहम्मद मोहसिनने टिकू दिले नाही. रिंकू ६ धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याला ५ धावांवरच हरमीत सिंगने बाद केले. यावेळी सूर्यकुमार यादव एक बाजू सांभाळत होता. त्याला काही काळ अक्षर पटेलने साथ दिली. त्यांच्यात ४१ धावांची भागीदारीही झाली. मात्र अक्षर पटेल १४ धावांवर १७ व्या षटकात बाद झाला.
त्यानंतर अर्शदीपला साथीला घेत सूर्यकुमारने आक्रमक फलंदाज केली. त्याने अर्धशतकही केले. यादरम्यान अर्शदीप १९ व्या षटकात ४ धावांवर बाद झाला. मात्र शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने २१ धावा चोपल्या. पण तो शेवटच्य चेंडूवर धावबाद झाला. सूर्यकुमारने ४९ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकात ८४ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने २० षटकात ९ बाद २६१ धावा केल्या. अमेरिकेकडून शेंडली वॅन शाल्क्विकने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच हरमीत सिंगने २ विकेट्स घेतल्या. अली खान आणि मोहम्मद मोहसिनने प्रत्येकी १ विकेट घेतली. टी-२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्या डावात सर्वोच्च खेळी करणारे कर्णधार
८८ धावा - ख्रिस गेल (वेस्ट इंडिज वि. ऑस्ट्रेलिया, द ओव्हल, २००९) ८४ धावा - सूर्यकुमार यादव (भारत वि. अमेरिका, वानखेडे, २०२६) ६८ धावा - बाबर आझम (पाकिस्तान वि. भारत, दुबई, २०२१) ६५ धावा - माहेला जयवर्धने (श्रीलंका वि. केनिया, जाहान्सवर्ग, २००७)
सामन्याचे संक्षिप्त धावफलक:
भारत: १६१/९ (२० षटके) - (सूर्यकुमार यादव ८४, टिळक वर्मा २५; शॅडली वॅन शालक्विक ४/२५) अमेरिका: १३२/८ (२० षटके) - (संजय कृष्णमूर्ती ३७, शुभम रांजणे ३७; मोहम्मद सिराज ३/२९, अर्शदीप सिंग २/१८, अक्षर पटेल २/२४) निकाल: भारत २९ धावांनी विजयी.







