Friday, February 6, 2026

संत कबीर

संत कबीर

पंडित होय के आसन मारे पंडित होय के आसन मारे, लंबी माला जपत है। अंतर तेरे कपट करतनी, सो भी साहब लिखता है ।।

- डॉ. देवीदास पोटे

संत कबीर यांच्या काव्यात काव्य आणि तत्त्वज्ञान यांचा मनोहारी संगम आहे. कबिरांच्या दोह्यातील शब्दांचा जेव्हा आपण आस्वाद घेतो तेव्हा त्या अर्थपूर्ण ओळी आपल्या चिंतनाचा आणि अनुभवाचा विषय होतात. त्यांचे दोहे रसिक मनाच्या कानात गुणगुणतात. कबीरदास टीका-टिप्पणी करताना अतिशय सोप्या, साध्या भाषेचा उपयोग करतात. या रचनेत कबीर म्हणतात, की पंडित मोठे आसन मांडून बसले आहेत आणि हातात एक मोठी माळ घेऊन जप सुरू आहे. पण आतून अंतरंग कसं आहे याचा पूर्ण हिशोब ईश्वरी शक्ती ठेवीत असते.

कबिरांचा रोख वरवर विद्वत्तेचे सोंग करणाऱ्या ढोंगी पंडितांवर आहे. वरवरचा वेश साधुत्वाचा आहे, पण अंतरंगांतील रंग काही काही वेगळेच आहेत. कबीर अशा काही शब्दांत अशा विद्वानांचा समाचार घेतात की, शब्दांचे मार खाणारा जेरबंद होतो आणि उलटून एक शब्दही बोलण्याची हिंमत करीत नाही. पंडित, मुल्ला-मौलवी अशा कुणालाही कबीरांनी सोडलं नाही. ज्याच्या अंगी खरं वैराग्य नाही तो परमेश्वराची भक्ती कशी करू शकणार? शुुद्ध आचार-विचार, स्वच्छ चारित्र्य, प्रेम, समर्पण या अध्यात्म मार्गातल्या महत्त्वाच्या पाऊलखुणा आहेत. नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ॥' असे संत तुकारामांनी सांगितले आहे.

कबिरांची भाषा सहज, सोपी आहे. त्यांच्या भाषेला पंचमोल' असे म्हणतात. कारण त्यांच्या भाषेत बोली भाषेतले अनेक शब्द सापडतात. म्हणून सामान्य जनांना त्यांची भाषा दुर्बोध वाटत नाही. अनेक ग्रंथ वा पोथ्या वाचून कुणी विद्वान पंडित होत नाही, हे त्यांनी ठासून सांगितले. मग खरा पंडित कोण? जो 'प्रेम' ही अडीच अक्षरे जाणतो तो खरा पंडित. हा प्रेमरस भरभरून सेवन केला की माणूस देवेपणाकडे वाटचाल करू लागतो. परमेश्वराला शुद्ध अंतःकरणाने सामोरे जावे असे त्यांचे सांगणे आहे. हा चिरंतन सत्याचा मार्ग आहे. येथे खोटेपणा, लबाडी, ढोंग यांना बिलकुल थारा नाही. म्हणूनच निरर्थक कर्मकांड, बाह्य विधी यांना कबिरांनी विरोध केला. परमेश्वराचे निर्गुण, निराकार स्वरूप ओळखून भक्तिमार्गाचा त्यांनी पुरस्कार केला.

संत कबीर यांनी कवित्वाचे साधन वापरून अध्यात्माची व्यापक बैठक लोकांना उलगडू्न दाखविली. त्यांच्या रचना अनुभूती संपन्न आहेत. या रचनांमधून त्यांनी भारतीय धर्मपरंपरेला एक मानवतावादी आणि व्यापक अधिष्ठान दिले. अमूर्त तत्त्वाला शब्दरूप करण्याचे त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment