मुंबई: मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाला गती देण्यासाठी गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा येत्या काळात सलग तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या नियोजनाला दुजोरा दिला आहे आणि लवकरच याची अधिकृत अंमलबजावणी सुरू होईल.
नवीन मार्गिकेसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी वांद्रे आणि खार दरम्यान असलेला जुना रेल्वे पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. सुरुवातीला हे काम सहा महिने चालणार होते. परंतु प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने हे नियोजन सहा महिन्यांवर आणले आहे. या प्रकल्पासाठी एकूण 964.84 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रकल्पाची अंतिम मुदत डिसेंबर 2027 पर्यंत असणार आहे.
या ब्लॉकमुळे मुंबईतील लाखो प्रवाशांचे हाल होणार आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये कपात केली जाणार आहे. सध्या गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान 88, तर वांद्रे ते सीएसएमटी दरम्यान 106 लोकल फेऱ्या धावतात. दररोज सुमारे 3.62 लाख प्रवासी या मार्गावरून पश्चिम रेल्वेकडून मध्य रेल्वेकडे (हार्बर मार्गे) प्रवास करतात. ब्लॉक काळात वांद्रे-सीएसएमटी दरम्यान मर्यादित सेवा सुरू ठेवण्याचा रेल्वेचा विचार आहे, पण गोरेगाव ते वांद्रे दरम्यान सेवा पूर्णपणे खंडित असेल.
प्रकल्प रखडण्यामागे काही महत्त्वाची कारणे समोर आली आहेत. महालक्ष्मी-लोअर परेल येथील शक्ती मिलच्या जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमधील 155 कुटुंबांचे पुनर्वसन अद्याप एमएमआरडीएकडून पूर्ण झालेले नाही. 2017-18 मध्ये 10 कोटी खर्चून उभारलेली 5 वी मार्गिका स्थानिक विरोधामुळे कार्यान्वित होऊ शकली नाही. जर ती तेव्हा सुरू झाली असती, तर आज पूल पाडण्याची आणि सेवा बंद करण्याची वेळ आली नसती, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
रेल्वेच्या मते, हा तीन महिन्यांचा त्रास सहन केल्यास भविष्यात मोठे फायदे मिळू शकतील. पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर चर्चगेट ते बोरीवली आणि विरार दरम्यान लोकल फेऱ्यांची संख्या वाढवता येईल. लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल गाड्या स्वतंत्र मार्गिकेवरून धावतील, ज्यामुळे लोकलच्या विलंबाचा प्रश्न मार्गी लागेल.






