पर्यटन, उद्योग, पाणी यासाठी मांडला मोठा आराखडा
जिल्हा परिषदेत भगवा फडकवण्याचे आवाहन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आंबेगावच्या विकासाची हमी
आंबेगाव : गावागावांचा विकास करणे हा शिवसेनेचा ध्यास असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देऊन ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणू, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आंबेगाव येथे उमेदवारांच्या प्रचारसभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सभेच्या सुरुवातीला नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी सांगितले की, लोकसभा-विधानसभा निवडणुकांत कार्यकर्त्यांनी आमदार-खासदार निवडून आणण्यासाठी कष्ट घेतले; मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या स्वतःच्या निवडणुका आहेत. त्यामुळे प्रत्येकाने कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजय मिळवून द्यावा. ते म्हणाले, “मी दरवर्षी भीमाशंकरला जातो आणि आंबेगाव माझ्या मनात आहे. तुम्ही विश्वास ठेवा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. शब्द दिला की पाळणारा एकनाथ शिंदे महाराष्ट्राने पाहिला आहे.”
मुख्यमंत्रीपदाच्या काळात घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी-लखपती योजना, एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सवलत, मुलींचे उच्च शिक्षण मोफत, शेतकरी सन्मान योजनेतून वार्षिक ६००० मदत, पिक विमा व अतिवृष्टी-अवकाळी नुकसानभरपाई वाढ तसेच एनडीआरएफचे निकष शिथिल करून जास्त नुकसानभरपाई दिल्याचे सांगितले.
गरीबी अनुभवली असल्यानेच महिलांसाठी योजना केल्या असून लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. १५०० मदतीमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला असून महिलांना स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार मिळाला, हे समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. अपघात, बिबट्याचा हल्ला किंवा अन्य आपत्तीमध्ये तातडीने धावून जाण्याची भूमिका सरकारची असल्याचे सांगून “महाराष्ट्र माझे कुटुंब आहे,” असे त्यांनी म्हटले. शिक्षण फीअभावी एका मुलीने आत्महत्या केल्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
आंबेगाव-शिरूर-जुन्नर परिसरासाठी पर्यटनाला चालना देणे, भोरगिरी-भीमाशंकर ट्रेकचा विकास, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प, पुणे रिंगरोडचा फायदा, सातगाव पठारावर उद्योग व एमआयडीसी, स्थानिक तरुणांना रोजगार, भीमाशंकर विकासकामांसाठी निधी, कुंभमेळ्यासाठी २४० कोटींचा आराखडा, कलमोडी पाणी योजना, नळपाणीपुरवठा प्रकल्प, कुकडी पाण्याचा प्रश्न सोडविणे, सोलर पंपांना एसीबी वीजजोडणी, बिबट्या दहशत कमी करण्यासाठी उपाय व रेस्क्यू सेंटर वाढवणे, आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा प्रयत्न आणि वन विभागातील रस्ते अडचणी दूर करणे अशा घोषणा त्यांनी केल्या. शिरूर तालुक्यातील वढू-तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी मोठा निधी, पूल, संग्रहालय, घाट व वाहनतळ उभारणीचा निर्णय घेतल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
तळेगाव ढमढेरे येथे कचरा व्यवस्थापन, पुनर्वसन, रुग्णालय उभारणी, अहिल्यादेवी होळकर स्मारक, पाणी-रस्ते-दिवाबत्ती आदी मूलभूत सुविधा देण्याचे तसेच शिंगवे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व शिवसृष्टीसाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विधानसभेत मिळालेल्या मोठ्या पाठिंब्याची पुनरावृत्ती जिल्हा परिषद-पंचायत समितीत करण्याचे आवाहन करत “ही निवडणूक आंबेगावच्या भवितव्याची आहे. पाच वर्षांत बदल घडवून विकास करणार, निधी कमी पडू देणार नाही,” असे सांगत येत्या ७ तारखेला मतदान करून सर्व अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार शरद सोनवणे, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख विकास रेपाळे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे सर्व उमेदवार यावेळी आवर्जून उपस्थित होते.






