बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातावरून राज्यात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अजित पवार यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केल्यानंतर १० दिवसांतच त्यांचा अपघात झाला, असा दावा करत संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे. "अजितदादा नेहमी भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल सोबत ठेवायचे, अपघाताच्या वेळीही ती फाईल विमानात असावी," असे विधान राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या या विधानाचा शिवसेना आमदार निलेश राणे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. मंगळवारी बारामती येथे जाऊन पवार कुटुंबाचे सांत्वन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, "अजितदादांना जाऊन अजून चार-पाच दिवसही झाले नाहीत, किमान अशा दुःखद प्रसंगी तरी घाणेरडे राजकारण करू नका." राऊतांनी माणुसकी जपण्याचा सल्लाही राणे यांनी यावेळी दिला.
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ...
एवढा नीचपणा बरा नव्हे...तिथली परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक
"अजितदादांना जाऊन जेमतेम ३-४ दिवस झाले आहेत, किमान आतातरी राजकारण थांबवा. महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा हा नीचपणा आहे," अशा कडक शब्दांत निलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला. अजित पवार यांच्या निधनानंतर राऊत यांनी उपस्थित केलेल्या संशयास्पद तर्कांवरून राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. बारामती येथे पवार कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर निलेश राणे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, सगळीकडे राजकारण? काहीतरी भान ठेवा. अगोदर आपण माणूस आहोत, मग कोण राजकारणी, कोण खेळाडू आहे. सगळीकडे राजकारण बरोबर नाही. एवढा नीचपणा राजकारणामध्ये पण बरोबर नाही. कुठेतरी स्तर राजकारणाला असला पाहिजे. कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजेत. मी त्यांच्या घरात जाऊन आलो आहे, तिथली परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक आहे. घरातील कर्ता माणूस गेला आहे, पण संजय राऊत यांना त्याचे काहीच वाटत नाही. त्यांना साधी माणुसकीही दाखवता आली नाही. अंत्यविधीला न जाता केवळ टीव्हीवर बसून तर्क लावणे ही कोणती संस्कृती?" संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या 'भ्रष्टाचाराच्या फाईल'च्या मुद्द्यावर बोलताना राणे म्हणाले की, राऊत यांना कोणाच्या कुटुंबाबद्दल काही भावना आहेत का? राजकारणात कुठेतरी मर्यादा आणि स्तर असायला हवा. केवळ राजकारण करण्यासाठी मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार करू नका, अशा शब्दांत त्यांनी राऊतांना फटकारले.





