मुंबई : बारामती येथे विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर देण्यात आली. त्यानंतर आता पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याबाबतचा अधिकृत आदेश मंगळवारी काढण्यात आला.
अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री म्हणून राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्यांक आणि औकाफ, तसेच क्रीडा युवक कल्याण ही खाती देण्यात आली. दरम्यान, अजित पवार हे पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर या जिल्ह्यांचे पालकत्व कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अपेक्षेप्रमाणे पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. यामुळे अजित पवार यांच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या पुढे नेण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्यावर आहे.
बीड जिल्ह्यात घडलेल्या वादग्रस्त घटनांनंतर अजित पवार यांनी स्वतःकडे या जिल्ह्याचे पालकत्व घेतले होते. त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील दौरे वाढवले होते. बीडसह पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न सुरू केले होते. तसेच बीड जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अजित पवार यांनी ठोस पावले उचलली होती.






