पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला असून, महिलांपासून मच्छीमारांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठीच अर्थसंकल्पात आनंदाची बातमी आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे मत खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील मुलींना सुरक्षा आणि शिक्षण: देशाची आणि जिल्ह्याची प्रत्येक मुलगी सुरक्षित वातावरणात शिकेल, याची खात्री करण्यासाठी जिल्ह्यात सुसज्ज 'गर्ल्स हॉस्टेल' उभारले जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. गावातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंना आणि हस्तकलेला आता हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. महिलांची उत्पादने शहरात आणि जागतिक स्तरावर विकण्यासाठी शी मार्ट उघडले जातील. यामुळे पालघरच्या महिलांच्या हाताला काम आणि खिशात पैसा येईल. तसेच पालघर जिल्ह्याची ओळख असलेल्या काजू आणि नारळाला आता ‘जागतिक ब्रँड’ म्हणून विकसित केले जाईल. सरकारने यासाठी विशेष तरतूद केली असून, यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा माल जगभरात पोहोचेल आणि त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेल. तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि नवीन उद्योग सुरू व्हावेत, यासाठी सरकारने १०,००० कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी तयार केला आहे. यातून तरुणाना नवीन स्टार्टअप्स आणि नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतील.
मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा : समुद्रकिनारी वसलेल्या मच्छीमारांसाठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता मच्छीमार बांधवांनी पकडलेल्या मासळीवर त्यांना कोणताही टॅक्स किंवा ड्युटी द्यावी लागणार नाही. यामुळे मत्स्य व्यवसायात मोठी वाढ होईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जुन्या आणि बंद पडलेल्या कारखान्यांना पुन्हा चालू करण्यासाठी २०० जुन्या औद्योगिक वसाहतींना पुनरुज्जीवित केले जाईल. यामुळे पालघरमधील तारापूर, बोईसर, वाडा, कुडुस या सारख्या औद्योगिक क्षेत्राला पुन्हा 'अच्छे दिन' येतील. हा अर्थसंकल्प पालघरच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास खासदार डॉ. सवरा यांनी व्यक्त केला जात आहे.






