Friday, April 3, 2026

फडणवीसांनी अडचणीच्या काळात मोहिते पाटलांना छत दिलं, ताकद दिली अन् तेच..., जयकुमार गोरेंची मोहिते पाटलांवर जोरदार टीका

फडणवीसांनी अडचणीच्या काळात मोहिते पाटलांना छत दिलं, ताकद दिली अन् तेच..., जयकुमार गोरेंची मोहिते पाटलांवर जोरदार टीका

सोलापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आणि मोहिते पाटील गटातील वाद आता जाहीर सभांच्या माध्यमातून उफाळून येऊ लागला आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.

सभेत बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीच्या काळात मोहिते पाटील यांना छत दिलं. संपत चाललेल्या पश्चिम महाराष्ट्रातील एका घराण्याला ताकद दिली. आणि आज तेच मोहिते पाटील त्यांच्या विरोधात बोलत आहेत, नाचत आहेत", अशा शब्दांत त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांनी छत काढले तर कारखान्याच्या गव्हाण बंद पडतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

काय म्हणाले गोरे? हत्ती बाजारातून जाताना कुत्री भुंकत असतात. हत्ती त्याकडे लक्ष देत नाही. पण हत्तीने एकदा सोंड फिरवली, तर काय होईल याचा विचार करा, असा सूचक इशारा जयकुमार गोरे यांनी दिला.

'अनेकांचे संसार देशोधडीला लावले, बँका बुडवल्या' गोरे यांनी म्हटले की, "अनेकांचे संसार देशोधडीला लावले, बँका बुडवल्या, इतकी पापं केली आहेत. पण तुमच्यावर टीका करून आम्हाला निवडणूक जिंकायची नाही. आमच्याकडे विकासकामांचा अजेंडा आहे. पण तुम्ही मर्यादेत रहा".

दरम्यान सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील आणि भाजप यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विविध सभांमधून भाजपचा "सुपडा साफ करू" अशी भाषा वापरल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या वक्तव्यांवर जयकुमार गोरे यांनी कासेगावच्या सभेत प्रत्युत्तर दिले आहे.

Comments
Add Comment