हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
कोची : दोन व्यक्तीच्या भांडणादरम्यान एकाने जा आणि मर यांसारखी विधाने करणे हे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे होत नाही. असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती सी. प्रदीप कुमार यांच्या एकलपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत संशयित आरोपविरोधात सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला.
या प्रकरणात याचिकाकर्ता एका विवाहितेसोबत नात्यात होता. मात्र त्याने दुसरीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. तरुणाने विवाहितेला "जा आणि मर" असे म्हटले. यानंतर त्या महिलेने तिच्या साडेपाच वर्षांच्या मुलीसह जीवन संपवले होते. सत्र न्यायालयाने या तरुणाचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ आणि कलम २०४ अंतर्गत आरोप निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला तरुणाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. संशयित आरोपीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती कुमार यांनी या प्रकरणात आरोपीचा हेतू काय होता हे महत्त्वाचे आहे. या निरीक्षणासह न्यायालयाने याचिकाकर्त्याची बाजू ग्राह्य धरली.






