Friday, February 27, 2026

कुर्ला पश्चिम भागातील तुंबणाऱ्या पाण्याचा आता बंदोबस्त...

कुर्ला पश्चिम भागातील तुंबणाऱ्या पाण्याचा आता बंदोबस्त...

मुंबई (सचिन धानजी) : कुर्ला पश्चिम येथील प्रिमियर नाल्याला जोडणाऱ्या भारतीय नगर नाला आणि विनोबा भावे नाल्याचे रुंदीकरण तसेच सुधारणा करण्यात येणार आहे. येथील विनोबा भावे नगर नाल्यावर मोठ्याप्रमाणात झोपड्यांचे अतिक्रमण असून हे अतिक्रमण आता नाला रुंदीकरणामध्ये हटवले जाणार आहे. त्यामुळे येथील भारतीय नगरसह आसपासच्या विभागात पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यामुळे होणारी समस्या आता कायमचीच दूर होणार आहे.

कुर्ला परिसरातील काही भागांमध्ये पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची मोठी समस्या लक्षात घेता महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यावतीने प्रिमियर नाल्याला जोडणारे सर्व उपनाले आणि रस्त्या लगतच्या पेटीका नाल्यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुर्ला पश्चिम येथील मोठया नाल्यांसह छोटे नाले आणि पेटीका नाल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. या कामांसाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी इकॉन इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीची निवड करण्यात आली आहे.

पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,प्रिमीयर नाला प्रणाली मधील भारतीय नगर नाल्यालगतच्या भारतीय नगर उपनाला-२ चे व त्याला जोडून असलेल्या पजवा पेटीकेचे आणि मोरेश्वर पाटणकर रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या रस्त्यालगतच्या पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची सुधारणा, पुनर्बाधणी व बांधकाम करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. बहुतांश भागातील पावसाचे पाणी वरील बाजुने उप नाला प्रणालीमधून म्हणजेच लालमाटी नाला आणि रामदेव पीर रस्त्यावरील पजवा पेटीका मधून वाहत येऊन मोठ्या नाल्यांना म्हणजेच भारतीय नगर नाल्याला मिळते.

प्रिमीयर नाला प्रणाली मधील भारतीय नगर नाला हा मोठा नाला आहे आणि भारतीय नगर उप नाला-२ हा रामदेव पीर रस्त्याच्या बाजूने सुरु होतो व पुढे विनोबा भावे नगर नाला येथे जावून मिळतो. या नाल्याचा बहुतांश भाग हा स्थानिकांनी नाल्यावर लादी बांधून अनधिकृत झोपडयांची बांधकामे करुन झाकलेला आहे. या नाल्यावरील या अनधिकृत बांधकामामुळे हा नाला मोडकळीस आलेला आहे व या नाल्यामधून पावसाळी पाण्याचा निचरा पूर्णपणे तथा व्यवस्थित होण्यास खुप अडथळा निर्माण होतो. परिणामी भारतीय नगर परिसराजवळील वस्त्यांमध्ये पावसाळी पाणी साचून दरवर्षी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे,या नाल्याची सुधारणा, तसेच पुनर्बाधणी व बांधकाम करण्यात येत आहे. ज्यामुळे पावसाळी पाण्याचा सहज व व्यवस्थित निचरा होऊ शकेल व भविष्यात कोणतीही जिवितहानी वा मालमत्तेचे नुकसान होणे टाळता येणे शक्य होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >