Wednesday, February 25, 2026

मैदानात उतरण्यापूर्वीच 'पाक'ने टेकले गुडघे, भारताविरुद्धच्या महामुकाबल्यातून माघार

मैदानात उतरण्यापूर्वीच 'पाक'ने टेकले गुडघे, भारताविरुद्धच्या महामुकाबल्यातून माघार

नवी दिल्ली  : आगामी टी-२० विश्वचषकाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. पाकिस्तान सरकारने या स्पर्धेतील आपल्या संघाच्या सहभागाला हिरवा झेंडा दाखवला असला, तरी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध खेळण्यास मात्र स्पष्ट नकार दिला आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा संघ मैदानात उतरणार नाही, अशी अधिकृत घोषणा रविवारी संध्याकाळी करण्यात आली.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पीसीबी प्रमुख मोहसीन नकवी यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. आयसीसीने बांगला देशच्या जागी स्कॉटलंडला संधी दिल्यामुळे पीसीबीने नाराजी व्यक्त केली होती. बांगलादेशवर अन्याय झाल्याची भूमिका घेत नकवी यांनी जागतिक क्रिकेट नियामक मंडळावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सरकारने आपल्या अधिकृत 'एक्स' हँडलवरून स्पष्ट केले की, ‘‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय क्रिकेट संघाला आयसीसी विश्वचषक २०२६ मध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे; मात्र १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या नियोजित सामन्यात पाकिस्तानचा संघ खेळणार नाही’’. यापूर्वी मोहसीन नकवी यांनी या संदर्भातील अंतिम निर्णय ३० जानेवारी किंवा २ फेब्रुवारी रोजी घेतला जाईल, असे संकेत दिले होते. मात्र, अपेक्षेपेक्षा एक दिवस आधीच सरकारने आपला पवित्रा जाहीर करून क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना तांत्रिकदृष्ट्या सोडून दिला आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या या स्पर्धेत पाकिस्तानचा समावेश 'गट अ' मध्ये आहे. या गटात भारत, नामिबिया, नेदरलँड्स आणि अमेरिका या संघांचा समावेश आहे. सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ आपल्या मोहिमेची सुरुवात स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच ७ फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याने करेल.

Comments
Add Comment