Wednesday, February 25, 2026

budget 2026 : कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांची आजच्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ बद्दल प्रतिक्रिया

budget 2026 : कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांची आजच्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ बद्दल प्रतिक्रिया

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा भारताच्या वेगवान विकासाला नवी दिशा देणारा आणि सर्वसमावेशक प्रगतीचा स्पष्ट आराखडा मांडणारा अर्थसंकल्प आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दूरदृष्टीतून सादर झालेला हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक परिवर्तनाचा मजबूत पाया घालणारा ठरेल.

या अर्थसंकल्पात एफडीआयच्या माध्यमातून सेमीकंडक्टर, फार्मा, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या उच्च तंत्रज्ञान उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून युवकांसाठी नव्या संधींचे दरवाजे खुले होणार आहेत. केवळ टेक्नॉलॉजी ड्रिव्हन विकास नव्हे, तर हँडलूम क्षेत्रातील कारागीर, पारंपरिक उद्योग आणि स्थानिक उद्योजक यांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचा समावेशक दृष्टिकोन या बजेटमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. महाराष्ट्र आणि कोकण विभागासाठी करण्यात आलेल्या घोषणा विशेष महत्त्वाच्या आहेत. कोकणातील नारळ व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग आणि उत्पादनवाढीवर आधारित प्रोत्साहन योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी ठरेल. भिवंडी, इचलकरंजी, पुणे आणि नाशिकसारख्या पारंपरिक औद्योगिक क्लस्टर्सच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय रोजगारनिर्मिती आणि निर्यात वाढीसाठी निर्णायक ठरेल.

मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोरमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक गतीला मोठी चालना मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबई येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) चे मुख्य केंद्र स्थापन केल्यामुळे ॲनिमेशन, गेमिंग, कॉमिक्स आणि AVGC क्षेत्रात मुंबईला जागतिक ओळख मिळणार आहे. ‘ऑरेंज इकॉनॉमी’ अंतर्गत १५,००० शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स सुरू होणार आहे यामुळे MMR विभागाला आणि महाराष्ट्र राज्याला देखील यामधून फायदा मिळणार आहे. याद्वारे मुंबईला या नव्या डिजिटल अर्थव्यवस्थेची राजधानी बनवण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय यामुळे अत्यंत स्वागतार्ह आहे.

आज गुरु रविदास जयंतीच्या पवित्र दिवशी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा समतेचा आणि संधींचा मार्ग दाखवणारा हा अर्थसंकल्प सादर झाल्याने त्याचे सामाजिक महत्त्व अधिक वाढते. या ऐतिहासिक अर्थसंकल्पासाठी मी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनापासून अभिनंदन करतो तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भर, समृद्ध आणि जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करेल, असा ठाम विश्वास व्यक्त करतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >