Sunday, February 1, 2026

भारताची युवा विश्वचषक उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान नेट रन रेटच्या गणितामुळे स्पर्धेतून बाहेर

भारताची युवा विश्वचषक उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान नेट रन रेटच्या गणितामुळे स्पर्धेतून बाहेर

बुलावायो  : १९ वर्षाखालील विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जात आहे. सेमीफायनलच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा होता. पण हा सामना संपण्यापूर्वीच भारताने अंडर-१९ विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. या सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे, तर भारताने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. नेट रन रेटच्या गणितामुळे भारताला उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले आहे.

सुपर सिक्स फेरीतील हा अखेरचा सामना होता. सुपर सिक्समधून दोन्ही गटातून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरी गाठणार होते. ए गटातून ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघांनी उपांत्य फेरी गाठली होती. ब गटातून उपांत्य फेरीतील तिकीट इंग्लंडने ८ गुणांसह पक्के केले होते. पण उपांत्य फेरीत ब गटातून आणखी एक संघ उपांत्य फेरीत पोहचणार होता. या जागेसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शर्यत होती.

सामन्यापूर्वी भारताचा सर्वात चांगला (३.३३) नेट रन रेट होता. भारताचे ६ गुण होते, तर पाकिस्तानचे १.४८ नेट रन रेटसह ४ गुण होते. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी विजय आणि नेट रन रेटचे गणित दोन्ही संघांसमोर होते. रविवारच्या  सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर २५३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला हे लक्ष्य ३३.३ षटकात पूर्ण करणे गरजेचेच होते किंवा किमन ३४.३ षटकापर्यंत जाऊन षटकारासह २५८ धावा करणे गरजेचे होते. भारताला काहीही करून पाकिस्तानला ३५ षटकांहून अधिक काळ फलंदाजी करायला लावायची होती.

अखेर ३५ षटकांपर्यंत पाकिस्तान ४ बाद १६८ धावांपर्यंतच पोहचू शकल्याने भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले. कारण यानंतर पाकिस्तानने विजय मिळवला आणि भारताप्रमाणे ६ गुणांपर्यंत जरी पोहचले, तरी भारताच्या नेट रन रेटला ते मागे टाकू शकणार नाहीत. त्यामुळे भारताचे बी गटातील पहिल्या दोन संघातील स्थान निश्चित झाले असून पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हानही संपले आहे. या सामन्यात भारतीय संघ ४९.५ षटकात २५२ धावांवर सर्वबाद झाला होता. भारताकडून वेदांत त्रिवेदीने ९८ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. तसेच कनिष्क चौहान (३५), आरएस आंब्रिश (२९), वैभव सूर्यवंशी (३०), विहान मल्होत्रा (२१) यांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाकिस्तानकडून अब्दुल सुभानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर ३५ षटकापर्यंत पाकिस्तानकडून हामजा जहूरन ४२ आणि कर्णधार फरहान हुसैनने ३८ धावा केल्या होत्या. उस्मान खानने अर्धशतक केले होते.

Comments
Add Comment