नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. यावर्षीचा बजेट हा युवकांना केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. विशेष म्हणजे या बजेटमधून दोन गंभीर आजारांवरील औषधं स्वस्त करण्यात आली आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
औषधांवरील आयात शुल्कमध्ये कपात:
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२६ सादर करताना मधुमेह (डायबिटीज) आणि कर्करोग (कॅन्सर) उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या औषधांवरील कर सवलती जाहीर केल्या. या निर्णयामुळे देशभरातील लाखो रुग्णांना उपचार खर्चात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकारने औषधांवरील आयात शुल्क, उत्पादन शुल्क तसेच काही कर घटकांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचा थेट फायदा मधुमेह व कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना, त्यांच्या कुटुंबियांना तसेच उपचार करणाऱ्या रुग्णालये आणि औषध विक्रेत्यांना होणार आहे. दीर्घकालीन उपचार घेणाऱ्या रुग्णांचा मासिक औषध खर्च देखील आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या अर्थसंकल्पात कॅन्सर थेरपीसाठी लागणारी काही अत्यावश्यक औषधे, इन्सुलिन व इतर मधुमेह नियंत्रणासाठी वापरली जाणारी औषधे, तसेच निदानासाठी लागणाऱ्या काही वैद्यकीय घटकांवरील शुल्क सवलतींचा समावेश आहे. परिणामी, बाजारातील एमआरपीमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अर्थसंकल्प २०२६ मंजूर झाल्यानंतर संबंधित अधिसूचना प्रसिद्ध होताच हे बदल टप्प्याटप्प्याने लागू होतील. पुढील काही आठवड्यांत औषध कंपन्या व वितरकांकडून नव्या किमती लागू होण्याची शक्यता आहे.






