पुजाऱ्यांना तीन पाळ्यांमध्ये काम करावे लागणार
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतासह जगभरातून कोट्यवधी भाविक रामचरणी नतमस्तक झाले. अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रामललाचे दर्शन घेण्याची आस आजही भाविकांमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राम मंदिरात सेवा करणारे पुजारी आता तीन पाळ्यांमध्ये काम करणार असल्याचे म्हटले जात आहे.
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते राम मंदिरावर धर्म ध्वजारोहण करण्यात आले. राम मंदिर परिसरात अनेक अन्य मंदिरही स्थापन करण्यात आली आहेत. राम मंदिर पूर्ण झाल्यावरही लाखो भाविक प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत येत आहेत. रामनगरी अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. राम मंदिर आणि हनुमानगढी येथे भाविकांची वाढलेली संख्या लक्षात घेता, प्रशासनाला दर्शन व्यवस्थेत बदल करावे लागले आहेत. राम मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे प्रत्येक भाविकाला सहज, सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी नवीन व्यवस्था लागू केल्या आहेत.
दर्शन घेण्यासाठी पाच रांगेतून भाविक दर्शन घेत होते. आता ही संख्या सात करण्यात आली आहे. राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाविकांच्या सोयीसाठी ही संख्या नऊ असणार आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि दर्शन प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
राम मंदिरामुळे अयोध्येचा कायापालट झाला असून स्थानिकांच्या अर्थकारणातही कायापालट झाला आहे. उद्योग व्यवसाय व रोजगारालाही चालना मिळाली आहे.





