Tirupati laddu : तिरुपती लाडू भेसळ प्रकरण : सीबीआयकडून मोठा खुलासा; लाडूमध्ये 'बीफ टॅलो' किंवा प्राण्यांची चरबी नसल्याचे स्पष्ट

नेल्लोर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात सीबीआयने (CBI) आपला अंतिम आरोपपत्र (Chargesheet) सादर केले आहे. या तपास अहवालात सीबीआयने अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष नोंदवला असून, २०१९ ते २०२४ या काळात तिरुपती प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात 'बीफ टॅलो' (गायीची चरबी) किंवा डुकराची चरबी (lard) नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



नेमके प्रकरण काय होते?


२०२४ मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तिरुपती लाडूमध्ये 'प्राण्यांची चरबी' वापरली जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांमुळे देशभरातील भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर सीबीआयचे विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले होते. २३ जानेवारी रोजी नेल्लोर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुमारे १६ महिन्यांच्या सखोल तपासानंतर सीबीआयने लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ नसल्याचे सिद्ध केले आहे, ज्यामुळे या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.



प्राण्यांची चरबी नाही तर...


तिरुपती लाडू भेसळ प्रकरणातील सीबीआयच्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी (Animal Fat) नव्हती, तर वनस्पती तेल आणि लॅबोरेटरी एस्टर्सचा (Laboratory Esters) वापर करून तयार केलेले 'बनावट तूप' वापरले गेले होते. विशेष म्हणजे, ज्या डेअरीने हे तूप पुरवले, तिथे दुधाचा एक थेंबही न वापरता तब्बल २५० कोटी रुपयांचे तूप तयार करण्यात आले. तपासात असे समोर आले आहे की, उत्तराखंडमधील भगवानपूर येथील 'भोले बाबा ऑर्गेनिक डेअरी' या मुख्य पुरवठादाराने एक 'व्हर्च्युअल' (केवळ कागदावर असलेली) मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवली. २०१९ ते २०२४ या काळात या डेअरीने आपल्या प्लांटमध्ये कोणतेही दूध किंवा लोणी खरेदी केले नाही. तरीही, त्यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानला (TTD) किमान ६८ लाख किलो (६८,००,००० किलो) तुपाचा पुरवठा केला. हे तूप पूर्णपणे कृत्रिमरित्या (Synthetically) तयार करण्यात आले होते. प्रयोगशाळेतील रसायनांचा वापर करून या तेलाला अशा प्रकारे बनवण्यात आले की, चाचणीमध्ये ते हुबेहुब दुधापासून बनवलेल्या तुपासारखेच दिसावे. साधारण २५० कोटी रुपये मूल्याचे हे भेसळयुक्त तूप प्रसादासाठी वापरून भाविकांच्या श्रद्धेशी खेळ खेळल्याचे सीबीआय तपासात निष्पन्न झाले आहे.



पुरवठादारांचा मोठा कट उघड...


तिरुपती लाडूसाठी वापरण्यात आलेल्या तुपाच्या भेसळीत केवळ सामान्य भेसळ नव्हती, तर ती अत्यंत नियोजित शास्त्रोक्त फसवणूक होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) केलेल्या रासायनिक विश्लेषणानुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानच्या (TTD) गुणवत्ता नियंत्रण प्रोटोकॉलला (Quality Control) बगल देण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. टीटीडी प्रशासन तुपाची शुद्धता तपासण्यासाठी प्रामुख्याने 'रीचर्ट-मीस्ल' (Reichert-Meissl - RM) व्हॅल्यूवर अवलंबून असते. शुद्ध तुपासाठी हे प्रमाण २४ ते २८ दरम्यान असणे आवश्यक असते. पुरवठादारांनी ही चाचणी फसवण्यासाठी कोलकात्याच्या 'बज बज कंपनी लिमिटेड' कडून मिळवलेले पाम ऑईल, पाम कर्नल ऑईल आणि पामोलिनचा बेस म्हणून वापर केला. या वनस्पती तेलांमध्ये विशिष्ट रसायने अशा प्रकारे मिसळली गेली की, प्रयोगशाळेत चाचणी करताना त्याचे 'RM व्हॅल्यू' बरोबर २४ ते २८ च्या दरम्यान आले. यामुळे भेसळयुक्त तूप असूनही ते चाचणीत 'शुद्ध' असल्याचे भासवण्यात पुरवठादार यशस्वी झाले. अशा प्रकारे विज्ञानाचा चुकीचा वापर करून देवस्थानची आणि कोट्यवधी भाविकांची फसवणूक करण्यात आल्याचे सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटले आहे.



रसायनांचा वापर करून तयार केले 'हुबेहुब' तूप; रंग, गंध आणि शुद्धतेच्या चाचणीतही दिली मात


सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, हे तूप केवळ बनावट नव्हते, तर ते अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने रसायने वापरून 'असली' असल्याचा भास निर्माण करणारे होते. यामध्ये दिल्लीतील एका व्यापाऱ्याचा मोठा हात असल्याचे तपासात समोर आले आहे. या कटातील १६ वा आरोपी, दिल्लीचा व्यापारी अजय कुमार सुगंध याने या सिंडिकेटला 'ॲसिटिक ॲसिड एस्टर्स' (Acetic Acid Esters) पुरवले होते. या रसायनाचा वापर तुपातील 'RM व्हॅल्यू' कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी केला गेला. यामुळे प्रयोगशाळेतील सामान्य चाचण्यांमध्ये भेसळयुक्त तूप असूनही ते शुद्ध असल्याचा खोटा अहवाल (False Positive) येत असे. केवळ चाचण्यांनाच नाही, तर भाविकांच्या डोळ्यांना आणि नाकालाही चकवा देण्यात आला होता. गाईच्या तुपाचा पिवळसर सुवर्ण रंग मिळवण्यासाठी त्यात 'बीटा कॅरोटीन' (Beta Carotene) मिसळण्यात आले. तसेच, शुद्ध दाणेदार तुपासारखा सुगंध यावा यासाठी कृत्रिम सुवासिक द्रव्यांचा (Artificial Flavoring) वापर करण्यात आला. २०२४ मध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ज्या 'एस-व्हॅल्यू' (S-Value) मधील बदलांचा उल्लेख केला होता, ते बदल प्राण्यांच्या चरबीमुळे नव्हे, तर या वनस्पती तेलांच्या आणि रासायनिक एस्टर्सच्या मिश्रणामुळे झाले होते, असे सीबीआयने स्पष्टपणे नमूद केले आहे. थोडक्यात, प्रसादाचे पावित्र्य जपण्याऐवजी रसायनांच्या जोरावर हा २५० कोटींचा काळाबाजार सुरू होता.



३६ जणांविरुद्ध आरोपपत्र


सीबीआयने मोठी कारवाई करत ३६ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या घोटाळ्यामागे केवळ पुरवठादारच नाही, तर देवस्थानचे तत्कालीन बडे अधिकारी आणि तज्ज्ञांचे एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या कटातील मुख्य सूत्रधार म्हणून टीटीडीचे (TTD) तत्कालीन जनरल मॅनेजर (खरेदी विभाग) आर.एस.एस.व्ही.आर. सुब्रमण्यम यांचे नाव समोर आले आहे. त्यांनी एका ब्लॅकलिस्टेड (काळ्या यादीतील) कंपनीचे टेंडर जाणीवपूर्वक मंजूर केल्याचा आरोप आहे. तसेच, दुग्धशाळा तज्ज्ञ विजया भास्कर रेड्डी यांनी 'भोले बाबा डेअरी'ला झुकते माप देत अनुकूल तपासणी अहवाल दिल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. यामध्ये टीटीडी अध्यक्षांचे माजी साहाय्यक चिन्ना अप्पन्ना यांचाही समावेश आहे. भोले बाबा डेअरीचे संचालक पोमिल आणि विपिन जैन यांनी २०१२ मध्ये कंपनी ब्लॅकलिस्ट झाल्यानंतरही आपला काळाबाजार सुरूच ठेवला. त्यांनी 'वैष्णवी डेअरी' (तिरुपती) आणि 'एआर डेअरी' (तमिळनाडू) यांसारख्या इतर कंपन्यांच्या माध्यमातून तेच कृत्रिम (Synthetic) तूप देवस्थानला पुरवले. सरकारी निर्बंधांना बगल देण्यासाठी या कंपन्यांचा केवळ 'मुखवटा' म्हणून वापर करण्यात आला होता.



"नायडू-कल्याण यांनी माफी मागावी"...


लाडूमध्ये प्राण्यांची चरबी नसल्याचे समोर आल्यावर, राज्यातील तत्कालीन सत्ताधारी पक्ष वायएसआर काँग्रेसने (YSRCP) मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. "खोट्या प्रचाराबद्दल" या दोन्ही नेत्यांनी माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांची माफी मागावी, अशी मागणी पक्षाने केली आहे. वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा खासदार वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत नायडू सरकारवर सडकून टीका केली. "तिरुमला हे करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आणि आध्यात्मिक केंद्र आहे, ते राजकारणाचे व्यासपीठ नाही. नायडू आणि पवन कल्याण यांनी या पवित्र क्षेत्रात राजकारण आणून भाविकांची दिशाभूल केली आहे, त्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे," असे रेड्डी यावेळी म्हणाले. गेल्या १६ महिन्यांपासून तिरुपती लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा जो दावा केला जात होता, तो सीबीआयच्या आरोपपत्रामुळे फोल ठरला आहे. यामुळे जगन मोहन रेड्डी यांच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चपराक बसली आहे, अशी भावना वायएसआरसीपीच्या नेत्यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ५जी (5G) सेवा सुरू करण्याच्या

Twisha Sharma Death Case : ट्विशा शर्मा प्रकरणात CBI चा मोठा खुलासा! वहिनीला शेवटचा मेसेज अन् अवघ्या काही मिनिटांत...

CBI कडून ६३६ पानांचे आरोपपत्र दाखल मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा (Twisha

Chrome Security Alert : Google Chrome वापरताय? थांबा...पहिलं हे काम करा, केंद्र सरकारचा हाय-अलर्ट

मुंबई : तुम्हीही रोजच्या कामासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर 'गुगल क्रोम' (Google Chrome) ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात