शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत हे गिधाडी वृत्तीचे आहेत, अशा शब्दांमधून भाजप प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या आरोपांचे खंडन करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शुक्रवार ३० जानेवरी रोजी मध्यमांशी बोलतांना संजय राऊत यांनी भाजपावर आरोप केले. त्या आरोपांचे नवनाथ बन यांनी खंडन केले आहे.
संजय राऊत यांनी केलेल आरोप :
अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या, सरकारनं नाही तर भाजपनं हे करणं कौतुकास्पद आहे. पण, याच भाजपनं अजितदादांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि यातलं काही ते सिद्ध करू शकले नाहीत. थेट पंतप्रधानांनी हा आरोप केला. माझी विनंती आहे की दादांवर खरंच तुमचं इतकं प्रेम असेल तर त्यांच्यावर केलेले आरोप मागे घ्या हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल. ही माझी विनंती आहे, राजकीय मागणी नाही. यात राजकारण नाही. अजितदादा आपल्यात नाहीत, नुसती श्रद्धांजली वाहून उपयोग नाही, त्यांच्यावरील आरोप मागे घ्या' याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला.
पुढे बोलतांना संजय राऊत म्हणाले की; "अद्याप मुंबईचा महापौर निवडला जात नाही, तारखा पुढेपुढे जात आहेत. यांच्यामध्येच अजून मतभेद आहेत. यात खूप वेळ वाया जात आहे. हे असं राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये? नगरसेवक निवडून आले आहेत त्यांना पालिकेत येऊ दे, कार्यकाळ सुरू होऊदेत . मात्र भाजप आणि शिंदे गटामध्ये मनपा सत्तेचं वाटप अडकून पडलं आहे."
राज्याची जनता त्यांना चांगला धडा शिकवेल :
त्यांच्या या आरोपांवर भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नवनाथ बन म्हणाले की; अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असतांना त्यांच्या नावाने राजकारण करणे ही 'गिधाडी' वृत्ती आहे. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या लाडक्या दादांना निरोप देत असतांना सिंचन घोटाळ्याचा विषय काढण्याची काही गरज नव्हती. संजय राऊत अजितदादांच्या निधनावरही नीच राजकारण करत आहेत, राज्याची जनता त्यांना चांगला धडा शिकवेल.
मित्रांच्या पाठीमागे खंजीर खुपसणाऱ्यांनी मैत्रीवर बोलू नये :
पुढे बोलतांना नवनाथ बन म्हणाले की; अजित पवार यांच्या श्रद्धांजली जाहिरातीवर संजय राऊत यांनी आक्षेप घेणे हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. भाजपाने आपल्या मित्राला श्रद्धांजली दिली म्हणून राऊत यांच्या पोटात दुखत आहे. मित्रांच्या पाठीमागे खंजीर खुपसणाऱ्यांनी मैत्रीवर बोलू नये. संपूर्ण महाराष्ट्र शोकात असताना राऊत मात्र सगळ्यांना सिंचन घोटाळ्याची आठवण करून देत होते, हे चुकीचे आहे. चितेचा अग्नि शांत होण्याच्या आधीच संजय राऊत यांच्याकडून राजकारण सुरू झाले आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. जाणीवपूर्वक अजितदादांना बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. राजकारण करण्यासाठी त्यांना पूर्ण ३६० दिवस असूनही त्यांना मात्र या चार - पाच दिवसांमध्येच राजकारण करायचे आहे.
महापौर हा महायुतीचाच होणार :
राऊत यांच्या महापौर निवडीच्या टीकेवर उत्तर देतांना नवनाथ बन म्हणाले की; महापौर हा महायुतीचाच होणार याबद्दल अजिबात शंका नाही. आमच्यात अजिबात रस्सीखेच नाही आहे. आमचं पहिल्या दिवसापासून ठरलं आहे की महापौर हा महायुतीचाच, आणि मराठीच होणार. मात्र सध्या शासकीय दुखवट्यामध्ये हा निर्णय घेण योग्य नाही. पुढच्या आठवड्यात योग्य वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याचा निर्णय घेतील.






