Friday, January 30, 2026

राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणासाठी अजित पवार होते सकारात्मक - जयंत पाटील; दोन्ही पक्षात अनेक गुप्त बैठका झाल्याचा दावा

राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणासाठी अजित पवार होते सकारात्मक - जयंत पाटील; दोन्ही पक्षात अनेक गुप्त बैठका झाल्याचा दावा

मुंबई : अजित पवारांच्या मृत्यूपश्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी या संदर्भात महत्त्वाचा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतरही पक्ष पुन्हा एकसंध व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले असून, या प्रक्रियेत अजित पवार सकारात्मक भूमिकेत होते, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतरही दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत, हीच त्यांची सुरुवातीपासूनची भूमिका होती. या भूमिकेतूनच त्यांनी आणि दुसऱ्या गटातील प्रमुख नेत्यांनी अनेक वेळा चर्चा आणि बैठका घेतल्या. या बैठका केवळ औपचारिक स्वरूपाच्या नव्हत्या, तर त्यामध्ये पक्षाचे भवितव्य, आगामी निवडणुकांची रणनीती आणि एकत्रिकरणाच्या शक्यतांवर सविस्तर विचारमंथन झाले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार यांच्यासोबतही या विषयावर अनेक वेळा सखोल चर्चा करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलयाच्या मुद्द्यावर अजित पवार सकारात्मक होते, असा ठाम दावा जयंत पाटील यांनी केला. दोन्ही गटांतील गैरसमज दूर करून पक्ष पुन्हा एकत्र यावा, अशी भावना अजित पवार यांची होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकींमध्ये कोणताही तणाव न ठेवता खुलेपणाने चर्चा झाली होती, असेही पाटील यांनी नमूद केले. या चर्चांदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुद्दा विशेषत्वाने पुढे आला होता. जयंत पाटील यांनी सांगितले की, अजित पवार यांची भूमिका अशी होती की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी आघाडी करून एकत्र लढवाव्यात. त्या निवडणुकांमधून जनतेचा कौल समजून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असे त्यांचे मत होते. याच अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी गटांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठकही पार पडली होती. या बैठकीत निवडणूक रणनीती, जागावाटप आणि आघाडीच्या शक्यतांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवर एकत्र काम केल्यास कार्यकर्त्यांमधील दरी कमी होईल आणि पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विचार या चर्चांमागे होता. निवडणुकांनंतर एकत्र येण्याचा निर्णय घेणे अधिक सोयीचे ठरेल, असे त्या वेळी ठरले होते, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. पक्ष हितासाठी एकत्र येणे गरजेचे मात्र, त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडी आणि अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे हे सर्व प्रयत्न अर्धवट राहिले, असे जयंत पाटील यांनी सांगितले. अजित पवार जिवंत असते, तर राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबाबतचा निर्णय वेगळ्या टप्प्यावर पोहोचला असता, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील दिशा आणि एकत्रिकरणाच्या शक्यतांबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले, तरी पक्षाच्या हितासाठी एकत्र येण्याची भूमिका आपण कधीही सोडलेली नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा