कालबद्धरितीने चौकशी पूर्ण करणार
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली असून, या दुर्घटनेच्या कारणांची सखोल व पारदर्शी चौकशी केली जाईल, असे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
बुधवारी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच नियंत्रण सुटले आणि ते थेट जमिनीवर आदळले. या दुर्घटनेनंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, गुरुवारी बारामतीत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक गावांमध्ये बंद पाळून नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धडाडीच्या आणि शिस्तप्रिय पर्वाचा आज बारामतीच्या मातीत शेवट झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ...
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी व्हावी आणि भविष्यात अशा घटना टळाव्यात, यासाठी तातडीची पावले उचलावीत, अशी मागणी करत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांना पत्र पाठवले होते. अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यासह इतर चार जणांचा मृत्यू हा अत्यंत गंभीर प्रकार असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले होते.
दरम्यान, या पत्राला उत्तर देताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांनी विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) कडून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून, नियमांनुसार सर्वंकष तपास केला जात आहे. तांत्रिक नोंदी, ऑपरेशनल तपशील आणि घटनास्थळावरील सर्व तथ्यांची पडताळणी करण्यात येत असून, ही चौकशी पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत, या दृष्टीने राज्य सरकारच्या सूचनेची मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून, चौकशी अहवाल प्राप्त होताच आवश्यक उपाययोजना केल्या जातील. या प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारचे सहकार्य महत्त्वाचे असून, स्थानिक प्रशासनाची मदतही अपेक्षित असल्याचे नायडू यांनी नमूद केले. संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.






