बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. बारामती येथील गोजुबावी परिसरात लँडिंग दरम्यान त्यांचे विमान कोसळले आणि भीषण स्फोट झाला. या हृदयद्रावक घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर सहा जणांचाही अंत झाला. एक 'मास लीडर' आणि शिस्तप्रिय प्रशासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित दादांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि विकासाची धडाडी यामुळे त्यांनी राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राज्यभरातून जनसागर लोटण्याची शक्यता असून, बारामती परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
बारामतीत जनसागर लोटणार
अजित पवार यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार असून, बारामती शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. काल संध्याकाळी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याचे साश्रू नयनांनी अंत्यदर्शन घेतले. सकाळी ९ वाजेपर्यंत पार्थिव काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल. निवासस्थानापासून मुख्य अंत्ययात्रेला सुरुवात होईल. काटेवाडी येथून निघालेली ही यात्रा 'ग. दि. मा. सभागृहा'मार्गे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाकडे मार्गस्थ होईल. सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंतिम विधी पार पडतील. अजितदादांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यातून समर्थक बारामतीकडे येत असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून काटेवाडी आणि विद्या प्रतिष्ठान परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. लाडक्या 'दादांना' अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीकरांनी सर्व व्यवहार बंद ठेवून शोक व्यक्त केला आहे.
अमित शाह, फडणवीसांसह बडे नेते अजितदादांना वाहणार श्रद्धांजली
या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हायअलर्टवर असून बारामती विमानतळावर विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, राज्यावर शोककळा पसरली आहे. काल संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीत जाऊन पवार कुटुंबाची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांसह अनेक राज्यांचे मंत्री अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. व्हीआयपींच्या आगमनासाठी बारामती विमानतळावर पोलिसांच्या फौजेसह NDRF चे पथकही तैनात करण्यात आले आहे. गर्दी आणि सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने काटेवाडी ते विद्या प्रतिष्ठान मैदानापर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.






