Wednesday, January 28, 2026

Ajit Pawar Death : पहाटेचा राजा, शिस्त, वचक, ७ वेळा उपमुख्यमंत्री अन् ४० वर्षांचा दरारा...राजकारणातील धगधगतं वादळ 'अजितदादा' काळाच्या पडद्याआड!

Ajit Pawar Death : पहाटेचा राजा, शिस्त, वचक, ७ वेळा उपमुख्यमंत्री अन् ४० वर्षांचा दरारा...राजकारणातील धगधगतं वादळ 'अजितदादा' काळाच्या पडद्याआड!

बारामती : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील आजचा दिवस एका काळ्या अध्यायाप्रमाणे उजाडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. लँडिंगच्या प्रक्रियेदरम्यान विमान कोसळून झालेल्या या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सहाही प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. विमान धावपट्टीवर उतरत असताना (Landing) अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि विमानाचे नियंत्रण सुटले. पाहता पाहता विमान जमिनीवर आदळले आणि त्याला भीषण आग लागली. हा अपघात इतका भयानक होता की, विमानाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून परिसरात धुराचे काळे लोट पसरले होते. या दुर्घटनेत अजित पवारांसोबत त्यांचे सहकारी आणि क्रू मेंबर्स अशा एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. 'दादा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांच्या निधनामुळे राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, राज्य सरकारने सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. प्रशासनाकडून या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, संपूर्ण महाराष्ट्र सध्या सुन्न अवस्थेत आहे.

एका वादळाचा अंत : 'सहकार' ते 'सहा वेळा उपमुख्यमंत्री'

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व आज कायमचे शांत झाले आहे. २२ जुलै १९५९ रोजी जन्मलेले अजित पवार केवळ एक नेते नव्हते, तर ते गतीमान प्रशासनाचे प्रतीक होते. १९८२ मध्ये स्थानिक राजकारणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या विक्रमी कारकिर्दीपर्यंत पोहोचला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक असा नेता गमावला आहे, ज्याचा प्रशासनावर प्रचंड वचक आणि शब्दाला मोठी किंमत होती. १९८२ मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरून त्यांनी सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले. १९९१ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी सलग आठ वेळा विधानसभेत बारामतीचे प्रतिनिधित्व केले. जलसंपदा, अर्थ आणि नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळताना त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप पाडली. "कामात स्पष्ट वक्तेपणा आणि वेळेचे पालन" ही त्यांची प्रमुख ओळख होती. महाराष्ट्राच्या इतिहासात सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा ऐतिहासिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा विविध मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी हे पद भूषवले. काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यात अजित पवारांचा मोलाचा वाटा होता.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

असा घडला अजित पवारांचा प्रभावशाली राजकीय प्रवास!

महाराष्ट्राच्या राजकारणात 'दादा' या नावाने परिचित असलेल्या अजित पवार यांनी आपल्या कारकिर्दीत सत्ता आणि संघटन या दोन्ही आघाड्यांवर आपली मोहोर उमटवली. १९९३ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मिळालेल्या संधीपासून सुरू झालेला हा प्रवास राज्याच्या सर्वोच्च पदांपैकी एक असलेल्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला. केवळ राजकारणच नव्हे, तर ग्रामीण महाराष्ट्राची अर्थवाहिनी असलेल्या सहकार क्षेत्रावरही त्यांची मजबूत पकड होती. १९९३ साली जेव्हा शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले, तेव्हा अजित पवार यांच्याकडे मंत्रिमंडळातील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. या संधीचे सोने करत त्यांनी प्रशासनावर आपली पकड निर्माण केली. २०१० मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचा राजकीय लौकिक अधिक उंचावला. या काळात राज्याच्या धोरणात्मक निर्णयात त्यांचा शब्द प्रमाण मानला जात असे. अजित पवार यांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणून मर्यादित नव्हती. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत त्यांनी मोलाचे योगदान दिले. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या जडणघडणीत आणि व्यवस्थापनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (PDCC) अध्यक्ष म्हणून काम पाहताना त्यांनी शेतकरी आणि सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. सहकार क्षेत्रातील शिस्त आणि पारदर्शकता ही त्यांच्या कामाची मुख्य वैशिष्ट्ये राहिली. राजकारण असो वा सहकार, अजित पवार यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या स्पष्टवक्तेपणाची आणि कामाच्या झपाट्याची छाप पाडली. त्यांच्या जाण्याने सहकार चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

जुलै २०२३ पुन्हा सांभाळली उपमुख्यमंत्रीपदाची धुरा

जुलै २०२३ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आणि सत्तेच्या केंद्रस्थानी राहून प्रशासनावर आपली पकड किती मजबूत आहे, हे पुन्हा एकदा दाखवून दिले होते. राज्याच्या राजकारणात जुलै २०२३ मध्ये झालेल्या मोठ्या उलथापालथीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या भूमिकेत त्यांनी राज्याच्या विकासकामांना गती देण्याचे काम केले. मंत्रालयातील फाईल्सचा निपटारा असो किंवा जिल्हा पातळीवरील आढावा बैठका, अजित पवारांच्या कामाची पद्धत नेहमीच 'रिझल्ट ओरिएंटेड' राहिली. ४० वर्षांहून अधिक काळाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने ते कोणत्याही गुंतागुंतीच्या प्रश्नावर झटपट मार्ग काढत असत. सत्तेत असताना सामान्यांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर त्यांचा नेहमीच भर असे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने महाराष्ट्राने एक मजबूत प्रशासक आणि अनुभवी मार्गदर्शक गमावला आहे, अशी भावना सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >