महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीवर बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "माझ्या मनात माझा मोठा भाऊ हरपला अशी भावना आहे," अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार यांच्या विमानाला आज बुधवार २८ जानेवारी रोजी बारामती येथे मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असून त्यांच्यासह अजून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अजित पवार यांचं विमान जळून खाक झालं.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
"मनाला चटका आणि वेदना देणारी ही घटना आहे. अजितदादा आपल्याला इतक्या लवकर सोडून जातील असा विचारही कोणी केला नसेल. दादा गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करत होते. अतिशय परखड व्यक्तिमत्व होतं त्यांचं. चूक त्याला चूक म्हणणारे ते असले तरी ते मनाने अतिशय निर्मळ होते, याचा अनुभव मी घेतला आहे. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलं आहे. अजितदादा यांना काम करताना वेळेच भान नसायचं. सकाळी ६ वाजता देखील ते लोकांना भेटायचे. परवाच आमची एका कार्यक्रमात भेट झाली होती. वयाने आणि अनुभवाने ते माझ्यापेक्षा मोठे होते, त्यामुळेच मला माझा मोठा भाऊ हरपला असं वाटत आहे. "
🏹 LIVE | 📍 ठाणे 🗓️ 28-01-2026 📹 पत्रकारांशी संवाद https://t.co/66Q0aDw3qT
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 28, 2026
बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचा ताबा सुटला आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. तसेच या अपघातात विमानाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.






