मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होवून पुढील प्रक्रिया महापालिका सचिव कार्यालयात पार पाडली जात आहे. त्यामुळे निवडून आलेले उमेदवार हे महापालिका सदस्य म्हणून नोंद होत असल्याने प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांना महापालिका मुख्यालयात बसण्यासाठी कार्यालय मिळावे यासाठी पक्षाच्यावतीने प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे उबाठाला मागील वेळेस दिलेल्या कार्यालयाच्या जागेवर शिवसेनेचा डोळा असून उबाठाला दिलेल्या या कार्यालयाचा काही हिस्सा आपल्या पक्ष कार्यालयासाठी उपलब्ध करून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ८९ आणि शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, शिवसेना आणि भाजप हे गट तयार करून नोंदणी करतात की स्वतंत्र यावर चर्चा सुरु असली तरी शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आल्याने त्यांना पक्ष कार्यालय उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. त्यामुळे आपल्या नगरसेवकांसाठी पक्ष कार्यालयाची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. महापालिकेतील मागील संख्याबळानुसार दिलेल्या कार्यालयानुसार शिवसेनेच्या वाट्याला काँग्रेसचे कार्यालय येवू शकते. परंतु काँग्रेसचेही २४ नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांनाही तेवढ्याच क्षमतेचे कार्यालय द्यावे लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी नवीन कार्यालयाचा शोध सुरु आहे. उबाठा शिवसेनेला मागील वेळेस ९० ते पुढे १०० सदस्य संख्ये आधारे पक्ष कार्यालय देण्यात आले होते. परंतु आता त्यांची संख्या ६५ झाल्यामुळे त्यांना दिलेल्या पक्ष कार्यालयाचे क्षेत्रफळ अधिक आहे. हे क्षेत्रफळ कमी करून शिवसेनेला तिथे कार्यालय देता येवू शकते.
उबाठाला दिलेल्या पक्ष कार्यालयाचे क्षेत्रफळ अधिक असल्याने भाजपच्या लगत असलेल्या उबाठाच्या कार्यालयात तात्पुरती भिंत उभारुन शिवसेनेला कार्यालय उपलब्ध करून देता येवू शकते. यामुळे उबाठाला देण्यात येणाऱ्या कार्यालयाचा आकार कमी होणार आहे. त्यामुळे उबाठाच्या कार्यालयाचा आकार कमी करून तिथे शिवसेनेचे कार्यालय उपलब्ध करून देण्याची मागणी असून प्रशासन आता त्याबाबत सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेचे संख्याबळ पाहता काँग्रेसचे कार्यालय त्यांना देवू शकते, अन्यथा भाजप आणि शिवसेनेच्या मध्यभागी उबाठाच्या कार्यालयाचा काही भाग कमी करून तिथे शिवसेनेचे कार्यालय तयार करता येवू शकते. अर्थात शिवसेनेला कोणती जागा हवी आहे किंवा नको याचा विचार पुढे होवू शकतो. तुर्तास काँग्रेस कार्यालयाच्या क्षेत्रफळाएवढी दुसरे कार्यालय नसल्याने उबाठा शिवसेनेला दिलेल्या पक्ष कार्यालयाचा काही भाग कमी केल्याशिवाय पर्यायच राहणार नसल्याचे बोलले जात आहे.






