मुख्यमंत्री मुंबईत आल्यानंतरच महापौरपदाचा निर्णय

शिवसेनेने अडीच वर्षांकरिता महापौरपद मागितले ही अफवा


स्पष्ट जनादेशानंतर जनतेला वादविवाद आवडणार नाही


मुंबई : ‘शिवसेनेने अडीच वर्षांकरिता महापौरपद मागितल्याच्या चर्चा या अफवा आहेत. आमच्यात कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत. महायुतीने मुंबईत एकत्रित निवडणुका लढविल्या आहेत. दावोस येथील परिषदेनंतर जेव्हा मी मुंबईला जाईन, तेव्हा आम्ही एकत्र बसून महापौर पदाबाबत निर्णय घेऊ. कोण महापौर होणार किंवा कोणाला कोणते पद मिळणार, अशा विषयात महायुतीत कोणताही संघर्ष अथवा वाद नाही’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस शुक्रवारी (दि. २३) मुंबईत येत आहेत. महापौर पदावरून भाजप-शिवसेनेत आलबेल नसल्याची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोखठोक भाष्य केले आहे.


जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी ते दावोसला रवाना झाले. महापालिका निकालांत विशेषतः मुंबईत भाजप व शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, निकालानंतर शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याने, महापौरपदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दावोस येथे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत भाष्य केले.


उद्धव ठाकरे व तुमच्यात चर्चा सुरू झाल्या आहेत का, या प्रश्नावर या सर्व वावड्या व अफवा आहेत. ठाकरेंसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आमची महायुती भक्कम आहे. महापौरपद किंवा इतर छोट्या-मोठ्या पदांसाठी भांडत बसणार नाही. जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला आहे. असा जनादेश मिळाल्यानंतर पदांसाठी भांडत बसणे योग्य नाही, लोकांना ते आवडणार नाही. त्यामुळे आम्ही ते करणारही नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.


जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार : मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीत जनतेने भाजप आणि महायुतीला मोठे यश दिले. त्यामुळे आता ट्रिपल इंजिनासोबत ट्रिपल जबाबदारी वाढल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखविली. जनतेचा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे. स्वच्छ, पारदर्शक आणि कार्यक्षम कारभारातून हा विश्वास सार्थ करणार असल्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.


महापौरपदाबाबत दिल्लीत बैठक




  • मुंबईच्या महापौरपदाबाबत सोमवारी सायंकाळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिल्लीत खल झाला. शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यात महाराष्ट्र सदनात बैठक झाली. या बैठकीत महापौरपदासह स्थायी समिती आणि इतर समित्यांबाबतही प्राथमिक चर्चा झाली. मुंबई पालिकेमध्ये सन्मानपूर्वक पदे मिळावीत, अशी भूमिका शिवसेनेने मांडल्याचे कळते. मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र सदनात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली.

  • या बैठकीत महापौर, स्थायी समिती, सुधार समिती, आरोग्य आणि शिक्षण समितीसह बेस्ट समितीत शिवसेनेला सन्मानजनक वाटा मिळावा, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली. आता शिवसेनेच्या मागण्यांचा तपशील घेऊन अमित साटम आणि आशिष शेलार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नवीन यांच्याशी चर्चा करतील. येत्या ३० जानेवारीला भाजपचा महापौर मुंबईत विराजमान व्हावा, अशी भाजप श्रेष्ठींची इच्छा असल्याचे अंतर्गत सूत्रांनी सांगितले.

Comments
Add Comment

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या

महापौरपदाची सोडत चक्राकार पद्धतीने?

या पध्दतीत खुल्या गटातील महापौराची शक्यता कमी मुंबई : मुंबईच्या महापौरपदासाठी येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण

श्री सिद्धिविनायक मंदिरात ‘माघी गणेश जयंती महोत्सवा'स सुरुवात

गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर चालणार धार्मिक सोहळा मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात

माघी श्रीगणेशोत्सव २०२६ करता कृत्रिम तलावांसह विविध सुविधा सज्ज

मुंबई : माघी श्रीगणेशोत्सव २२ जानेवारी २०२६ पासून साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा

मुंबई पालिकेच्या शैक्षणिक इतिहासात नवा टप्पा

सीबीएसईच्या पहिल्या १० वीच्या बॅचसाठी ३६६ विद्यार्थी तयार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात