तैवान : तैवानमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूमागे धक्कादायक कारण समोर आलं असून, रोजच्या वापरातील एका साध्या वस्तूमुळे त्याच्या शरीरात हळूहळू विष साचत गेल्याचं डॉक्टरांच्या तपासात स्पष्ट झालं आहे. दीर्घकाळ चाललेल्या या प्रक्रियेमुळे त्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाले आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.
ही घटना एका रस्ते अपघातानंतर उघडकीस आली. वाहन चालवत असताना अचानक नियंत्रण सुटल्याने संबंधित व्यक्तीची कार थेट एका दुकानात घुसली. सुरुवातीला हा अपघात किरकोळ असल्याचं मानलं जात होतं. मात्र वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांना अनेक गंभीर लक्षणे आढळून आली.
रुग्णाच्या मेंदूच्या एका भागात आकुंचन, तीव्र थकवा, स्नायूंची कमजोरी, मूत्रपिंडावर परिणाम आणि चव ओळखण्याची क्षमता कमी होणं अशी लक्षणे दिसून आली. जेवणात नेहमीच मीठ कमी असल्याची भावना त्याला होत होती. रक्तचाचणीत शरीरात शिशाचं प्रमाण अत्यंत धोकादायक पातळीवर असल्याचं निष्पन्न झालं.
तपास अधिक खोलात गेल्यानंतर यामागचं कारण समोर आलं. संबंधित व्यक्ती गेली सुमारे दोन दशके एकाच थर्मासमधून दररोज कॉफी घेत होता. कालांतराने त्या थर्मासचं आतील आवरण खराब झालं होतं. गरम आणि आम्लयुक्त पेयांमुळे धातूचा आतील थर झिजत गेला आणि त्यातून सूक्ष्म प्रमाणात शिसं पेयात मिसळू लागलं. हे शिसं वर्षानुवर्षे शरीरात साचत गेलं.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, दीर्घकाळ शिशाच्या संपर्कात राहिल्याने मेंदूवर, मज्जासंस्थेवर आणि इतर अवयवांवर गंभीर परिणाम होतात. या रुग्णालाही स्मरणशक्ती कमी होणं, गिळताना त्रास होणं आणि श्वसनाशी संबंधित गुंतागुंत निर्माण झाली होती. कार अपघातानंतर सुमारे एका वर्षाच्या उपचारांनंतर त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना जुन्या, खराब झालेल्या भांड्यांचा विशेषतः गरम पेयांसाठी वापर टाळण्याचा सल्ला दिला असून, दैनंदिन सवयींकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही दिला आहे.






