Saturday, January 17, 2026

Raj Thackeray : राज ठाकरेंचे मतदारांना पत्र, पत्रातील भाषेवरुन भाजपची राज ठाकरेंवर टीका

Raj Thackeray : राज ठाकरेंचे मतदारांना पत्र, पत्रातील भाषेवरुन भाजपची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. या विजयानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे विजयाला 'धनशक्ती' आणि 'सत्तेची शक्ती' असे संबोधले होते. या टीकेला भाजपने आपल्या शैलीत उत्तर दिले असून, हा विजय केवळ विकासाचा आणि जनतेने मोदी-फडणवीस-महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाचा आहे, असे स्पष्ट केले आहे.

राज ठाकरेंच्या टीकेवर भाजपचा पलटवार

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये "अचाट धनशक्ती आणि सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती" अशी ही लढाई असल्याचे म्हटले होते. त्यावर भाजपच्या नेत्यांनी कडाडून टीका केली आहे. "जेव्हा जनता भाजपला निवडून देते, तेव्हा त्याला धनशक्ती म्हणणे हा मतदारांचा अपमान आहे. मुंबईसह २१ महापालिकांतील जनतेने प्रगतीला मतदान केले आहे, अस्मितेच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे," अशी भूमिका भाजपकडून मांडण्यात आली आहे.

'मराठी अस्मिता' की 'मराठी विकास'?

राज ठाकरे यांनी मराठी माणसाला नागवण्याचे कारस्थान सत्ताधारी करत असल्याचा आरोप केला. यावर भाजपने उत्तर दिले की, "मराठी माणूस आता प्रगल्भ झाला आहे. त्याला केवळ घोषणा नकोत, तर रस्ते, मेट्रो, पाणी आणि पारदर्शक प्रशासन हवे आहे. भाजपच्या काळात झालेली विकासकामेच मराठी माणसाच्या हिताची आहेत, हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे."

राज ठाकरेंच्या पत्रात काय लिहिलंय ?

सस्नेह जय महाराष्ट्र,

सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! ! आपला नम्र

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >