Saturday, January 17, 2026

आमचे हिंदुत्व संकुचित नाही : मुख्यमंत्री

आमचे हिंदुत्व संकुचित नाही : मुख्यमंत्री

२४ तास काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना महाविजय समर्पित

मुंबई (प्रतिनिधी) : आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे नाही, तर व्यापक हिंदुत्व मानणारे आहोत. आमच्या हिंदुत्वात सगळ्यांचा समावेश आहे. जो जो भारताच्या संस्कृतीला आपली संस्कृती समजतो आणि भारतीय प्राचीन जीवनपद्धतीला आपली जीवनपद्धती मानतो, त्याची पूजा पद्धती कशीही असली तरी त्यांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत समाविष्ट करतो. म्हणूनच यानिमित्ताने इतके मोठे जनसमर्थन मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेत महापौर बसल्यानंतर पुन्हा एकदा जल्लोष साजरा करू या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर ते भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित जल्लोष कार्यक्रमात बोलत होते. पक्षासाठी २४ तास काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा विजय समर्पित करत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे-पाटील आणि मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो, कारण महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला मोठा विजय त्यांनी मिळवून दिला. या निवडणुकांमध्ये सगळे रेकॉर्ड तोडले गेले असून, २९ पैकी २५ महानगरपालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता आली आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जरी मतमोजणीला उशीर होत असला आणि काही मतमोजणी बाकी असली तरी विद्यमान ट्रेंड पाहता, महायुतीला निश्चितपणे पूर्ण बहुमत मिळेल आणि मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल, याबाबत कोणतीही शंका नाही. ज्या मुद्द्यांवर आम्ही ही निवडणूक लढलो, त्या मुद्द्यांना लोकांनी प्रतिसाद दिला आणि पुढेही आमचा अजेंडा विकासाचा राहणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. एकेका शहराला परिवर्तित करून तेथे राहणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या जीवनात मोठा बदल घडवण्यासाठी हा विजय आम्ही समर्पित करणार आहोत. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट सांगितली पाहिजे की आमचा कार्याचा आत्मा आणि विचारांचा आत्मा हिंदुत्ववाद आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. हिंदुत्व आणि विकास यांना वेगळे करता येणार नाही. आज हा आमचा आत्मा आम्हाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवतो आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
Comments
Add Comment