Friday, January 16, 2026

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत विजय मिळवला आहे. २१ महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करत भाजपने राज्याच्या राजकारणात आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले असून विरोधकांचा मोठा पराभव केला आहे. या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. या दोन्ही पक्षांना केवळ काही मोजक्या जागांवरच समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेचा २५ वर्षांचा गड ढासळला या निकालातील सर्वात मोठा उलथापालथ मुंबईत पाहायला मिळाली. गेल्या २५ वर्षांपासून असलेली शिवसेनेची सत्ता संपुष्टात आली असून, मुंबई महानगरपालिकेवर आता भाजपचा झेंडा फडकला आहे.

भाजपचा 'महा-विजय' आणि राजकीय वर्चस्व

राज्यात भाजपची जोरदार लाट महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनुसार संपूर्ण महाराष्ट्रात भाजपची मोठी लाट दिसून येत आहे. मतमोजणीच्या कलांनी हे स्पष्ट केले आहे की, भाजपने विरोधकांना मागे टाकत २१ महापालिकांमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपने केवळ जागाच जिंकल्या नाहीत, तर राज्यातील महत्त्वाची आर्थिक आणि राजकीय केंद्रे आपल्या ताब्यात ठेवली आहेत, मुंबईमध्ये शिवसेनेच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने मुंबईवर कब्जा केला. तर पुणे, नागपूर आणि नाशिक या मोठ्या शहरांमधील आपली सत्ता भाजपने यशस्वीपणे कायम राखली आहे.

भाजपची सत्ता असलेल्या महापालिका

मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, इचलकरंजी, सांगली मिरज कुपवाड, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती, नाशिक, धुळे, जळगांव, अहिल्यानगर (अहमदनगर), जालना, नांदेड वाघाळा आणि छत्रपती संभाजीनगर.

ठाणे आणि कल्याणमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या आपल्या हक्काच्या बालेकिल्ल्यांमध्ये वर्चस्व टिकवून ठेवले आहे. या दोन महत्त्वाच्या महापालिकांवर शिवसेनेचा भगवा कायम आहे.

काँग्रेस आणि ठाकरे गटाची स्थिती काय?

काँग्रेसला केवळ ३ महापालिकांमध्ये यश मिळाले आहे. यामध्ये लातूर आणि भिवंडी निजामपूरमध्ये त्यांनी स्वबळावर, तर चंद्रपूरमध्ये शिवसेना (UBT) च्या साथीने सत्ता स्थापन केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला परभणीमध्ये यश मिळाले आहे, तिथे त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता मिळवली आहे. बहुजन विकास आघाडीने आपलं अस्तित्व टिकवत वसई-विरार महापालिकेवर पुन्हा एकदा पकड मजबूत केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर ही महापालिका निवडणूक बहुजन विकास आघाडीसाठी महत्त्वाची होती.

मालेगावमध्ये अपक्षांचा 'किंगमेकर' रोल

मालेगाव महानगरपालिकेचा निकाल मात्र पेचात अडकला आहे. येथे कोणत्याही प्रमुख पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्तेच्या चाव्या आता अपक्षांच्या हाती असून, ते कोणाला पाठिंबा देतात यावर मालेगावचा महापौर ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >