रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था
वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था, भरधाव वाहने यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनली आहेत. रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र हद्दीत दिवसाला जवळपास २ ते ३ अपघात होत आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२५ कालावधीत रायगड पोलीस दुरक्षेत्र हद्दीत ६२७ अपघात झाले असून, या अपघातांमध्ये २५८ जणांचा मृत्यू झाला असून, ७८० जण जखमी झाले आहेत.
रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. चालकांनी वाहन सावकाश चालवावे यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर वाहतूक पोलीस वाहनचालकांची तपासणी करतात. वाहन चालकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई हाती घेतली आहे. एवढे प्रयत्न केल्यानंतर अपघातांची संख्या कमी करण्यात यश मिळाले आले तरी जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. मागील वर्षभरात जिल्ह्यात ६२७ अपघात झाले असून, यामध्ये २५८ जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघातांची प्रमुख कारणे
१) महामार्गांची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालविणे. २) रस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने. ३) रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणे. ४) कोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन दुसऱ्या बाजूला नेणे. ५)मद्य पिऊन वाहन चालविणे धोकादायक वळणे.






