मिलिंद रघुनाथ पोतनीस
या अटीतटीच्या, संघर्षाच्या काळात, पक्षप्रमुख म्हणून तुम्ही कधीच बाळासाहेबांसारखा बाणेदारपणा आणि तडफ दाखवली नाही. ‘फक्त माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, माझी निशाणी चोरली’ म्हणून रडगाणं गात राहिलात. मतदारांची सहानुभूती गोळा करण्याचा तो केविलवाणा प्रयत्न वाटत होता. ‘वडील चोरीला गेलेत, तर पोलिसात तक्रार द्या’ म्हणून आमची टर उडवतात!
१९९९ ला राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं. ‘लखोबा लोखंडे’ उपमुख्यमंत्री झाला. २५ जून २००० रोजी या ‘लखोबा’ने १९९२/९३ च्या मुंबई दंगलींचं जुनं प्रकरण उकरून काढून या बाळासाहेबांना अटक करण्याची तयारी केली होती. आज तोच ‘लखोबा’ उद्धवसाहेबांच्या मंत्रिमंडळात मंत्री होता! मांडीला मांडी लावून तुम्ही त्या कपटी कारस्थानी ‘लखोबा’बरोबर बसू शकता, पण आपले जुने कट्टर शिवसैनिक नारायण राणे यांना भरल्या ताटावरून उठवता? माझ्या मनाची भयंकर तगमग होत होती. प्रश्नांना उत्तर तरी कोण देणार? कारण इथे प्रश्न विचारायलाच बंदी होती. उद्धवसाहेब म्हणतील तीच पूर्व दिशा.
‘अरे त्याची लायकी काय?’ म्हणून उसनं अवसान आणून भक्तांना तडकवताना, माझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी कमीत कमी जेवताना तरी उठवायला नको होतं. शेवटी कितीही झालं, तरी तो आपलाच माणूस होता. हाडाचा शिवसैनिक होता यार तो... असं कायम सलत राहतं.
याच दरम्यान कोरोनाची लस आली होती. ‘महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख’ म्हणून १२ कोटी लसी एकरकमी घेण्याची हिंमत आणि ताकद उद्धवसाहेबांनी दाखवली. पुढे कित्येक दिवस भक्तांच्या तोंडावर मारण्यासाठी मी त्या बातमीचा अंक जवळ ठेवत होतो, पण उद्धवसाहेबांवर जळणाऱ्या गुजरातच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या देशाला फुकट लस वाटून उद्धवसाहेबांना त्याचं श्रेयच मिळू दिलं नाही.
फेब्रुवारी २०२२ मध्ये उद्धवसाहेबांच्या मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. हे प्रकरण देशद्रोही आणि फरार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या बेकायदेशीर कारवायांशी आणि मालमत्ता व्यवहारांशी संबंधित होतं. खरं म्हणजे, उद्धवसाहेबांनी नवाब मलिकाचा राजीनामाच घ्यायला हवा, असं आम्हां शिवसैनिकांना वाटत होतं. घ्यायचा की नाही, हा त्यांचा विशेष अधिकार होता. पण, राष्ट्रवादीच्या ‘लखोबा लोखंडे’ने ‘मलिक यांना अटक झाली असली, तरी त्यांचा न्यायदेवतेपुढे गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही,’ असं परस्पर सांगून टाकलं. सरकार उद्धवसाहेबांचं होतं, की ‘लखोबा लोखंडे’चं? आणि ‘लखोबा’च्या या आगाऊपणावर उद्धवसाहेबांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. माझ्यासाठी हा भ्याडपणा होता.
नवाब मलिक तुरुंगातून आपलं मंत्रालय चालवतात, असंच चित्र विरोधकांनी उभं केलं. उद्धवसाहेबांनी नवाब मलिकांचा राजीनामा शेवटपर्यंत घेतला नाही. त्यामुळे, हे चित्र उभं राहिलं आणि जनतेने त्यावर विश्वासदेखील ठेवला. असला मौका सोडतील, तर ते भक्त कसले? उद्धवसाहेबांना ते ‘कणाहीन लाचार मुख्यमंत्री’ म्हणू लागले. एक हरामखोर भक्त, मित्र, मला एक फोटो दाखवून म्हणाला, ‘हे बघ सिल्व्हर ओकवरचं पायपुसणं’. आता समोरून भक्त मित्र येताना दिसला, की मी गल्ली बदलायला लागलो.
या जवळपास २.५ वर्षांच्या उद्धवसाहेबांच्या कारकिर्दीत त्यांच्या भाषणातून सुरुवातीच्या ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो’ या आजपर्यंतच्या परिपाठाऐवजी ‘जमलेल्या माझ्या तमाम बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो’, असा मराठी किंवा देशभक्त किंवा काहीच विशेषण न लावता नुसता कोरडा उल्लेख होऊ लागला. उद्धवसाहेबांनी ‘हिंदू’ हा उल्लेख गाळल्यामुळे आम्हा सैनिकांना आमचं अस्तित्व सत्वहीन, प्राणहीन वाटू लागलं. शिवसेनेतला प्राणच निघून गेल्यासारखं वाटू लागलं. पण, वंदनीय बाळासाहेबांवरच्या नितांत प्रेमामुळे आणि त्यांना मनोमन दिलेल्या ‘आम्ही उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेबांना सांभाळू’ या वचनामुळे ही सगळी घुसमट होत असतानादेखील मी शिवसेनेत टिकून राहिलो.
दुसऱ्या बाजूला आमचे प्रवक्ते आणि मुलुख मैदानी तोफ संजय राऊतसाहेब महाविकास आघाडीची सत्ता पुढची २५ वर्षे राहणार, असं छातीठोकपणे वारंवार सांगत होते. कागदोपत्री हिशोब मांडला, महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद लक्षात घेतली, तर ते अगदी सत्य सांगत होते. आमच्या ३ पक्षांची ताकद आणि शरद पवारांसारख्या राजकीय चाणक्याचं नेतृत्व २५ वर्षं महाविकास आघाडीची सत्ता कुठे जाणार नव्हती, या राऊत साहेबांच्या वचनावर आमचा पूर्ण विश्वास होता आणि महाविकास आघाडीची सत्ता म्हणजे पुढची २५ वर्षं उद्धवसाहेब किंवा आदित्यसाहेब मुख्यमंत्री ही काळ्या दगडावरची रेघ होती. याच आनंदात आम्ही होतो. विरोधी पक्षात एकटा भाजप होता. त्याची ताकद असून असून ती काय असणार? सुप्रियाताई सुळेंनी ‘अकेला देवेंद्र क्या करेगा?’ म्हणून त्याला त्याची औकात दाखवून दिली होती. बाकी ते दोघे ढोकळा-फाफडा-जलेबीवाले गुजराती दिल्लीत होते. महाराष्ट्रात फक्त ‘ठाकरे ब्रँड’ चालणार होता. आम्ही खुशीत गाजरं खात होतो आणि एवढ्यात...
२१ जून २०२२ रोजी विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आमचे कट्टर शिवसैनिक आणि उद्धवसाहेबांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे बहुसंख्य आमदार (सुमारे ४०) संपर्काबाहेर गेले. हा आमच्यासाठी प्रचंड मोठा धक्का होता. आम्ही हादरलो होतो. हे बाजारबुणगे आधी सुरत, गुजरात आणि नंतर गुवाहाटी, आसाम येथील भाजपशासित राज्यांत थांबले. याचा अर्थ स्पष्ट होता, या गद्दारांना दिल्लीचे ते दोन दाढीवाले फूस लावत होते! एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी आरोप केला, की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात आणि सरकारमध्ये त्यांना सातत्याने डावललं गेलं; निर्णय प्रक्रियेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही. अनेक आमदारांनी निधीवाटपावरून नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या खात्यांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप होत असल्याचंही त्यांचं म्हणणं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राहिल्यास पुढील निवडणुकीत विजय मिळवणं कठीण होईल, असंही बहुतेक आमदारांचं म्हणणं होतं. गद्दारी शिवसेनेला नवीन नव्हती. यापूर्वी बंडू शिंगरे, छगन भुजबळ, राजसाहेब ठाकरे यांनी गद्दारी केलीच होती. पण, शिवसेनेच्या बुरुजाचा एक चिरादेखील ढासळला नव्हता. आता मात्र किल्ल्याचे दरवाजे आतूनच उघडले गेले होते. शिवसेनेत अक्षरशः दुफळी माजली होती.
एकनाथ शिंदे आणि ४० आमदार सत्ता सोडून गद्दारी करतात, त्यांच्यामागोमाग शिवसेनेचे १३ खासदारदेखील गद्दारी करतात आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धवसाहेबांना हे कळूदेखील नये? आणि कळूनही त्यांनी गद्दारांना थांबवण्याचा प्रयत्न करू नये? माझ्या तर काही लक्षातच येत नव्हतं. डोळ्यांसमोर अंधार आणि मनात घोर निराशा... अशी माझी ‘सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी भयंकर अवस्था झाली होती. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री उद्धवसाहेबांनी बहुमत चाचणीला सामोरं जाण्याऐवजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मला दुःख अनावर झालं. डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. मनोमन मी गद्दारांना शापू लागलो. म्हणजे, राऊतसाहेब आम्हाला हुतीया बनवत होते तर...
वास्तविक उद्धवसाहेबांनी राजीनामा देण्याचं कारणच नव्हतं. ते विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असते, तर कदाचित सगळे गद्दार व्हिपच्या विरोधात जाऊन मतदान केल्यामुळे अपात्र ठरले असते! त्यांच्या आमदारक्या गेल्या असत्या! आणि होऊन होऊन काय झालं असतं? जास्तीत जास्त सरकार कोसळलं असतं! तसेही ते उद्धवसाहेबांच्या राजीनाम्याने कोसळलंच की... त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या इतिहासात एक नोंद झाली असती. गद्दारांची गद्दारी महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजात कायमची लिहिली गेली असती आणि गद्दारांविरुद्धच्या पुढच्या कायदेशीर कारवाईला शिवसेनेच्या बाजूने एक बळ मिळालं असतं.
उद्धवसाहेबांच्या आततायीपणामुळे सगळाच मामला गंडला. आपल्याला न विचारता उद्धवसाहेबांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भयंकर नाराज झाले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आपण विधान परिषदेच्या सदस्यत्वाचादेखील राजीनामा देत आहोत, असं उद्धवसाहेबांनी जाहीर केलं. पण, आजपर्यंत तो दिलेला नाही. ही भक्ताडं आजही त्यावरून आमचा जीव नकोसा करतात.
विमानातून उतरवल्याचा राग मनात ठेवलेल्या त्या थेरड्या राज्यपालाने एका पायावर तयार होऊन गद्दार एकनाथ शिंदे उर्फ मिंधे यांना भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. टरबूजाने उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याच्या पुढचा इतिहास मी तुम्हाला सांगत नाही, कारण तुम्हाला सगळंच ठाऊक आहे.पण एक बाळासाहेबांचा मुंबईकर कट्टर शिवसैनिक म्हणून मी पाठी वळून विचार करतो, तेव्हा लक्षात येतं आज आमच्या हातात काय राहिलंय?
मोदी शहांच्या बटिक असलेल्या निवडणूक आयोगाने आमचा शिवसेना पक्ष, आमचे चिन्ह धनुष्यबाण, मिंध्यांच्या गटाला देऊन टाकलं. आमच्या नशिबी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेण्याची अगतिकता आली. निवडणूक चिन्ह म्हणून मशाल घ्यावी लागली.नुसते आमदार खासदार नाहीत, तर ठिकठिकाणचे नगरसेवक फुटले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागून आम्ही हिंदुत्व सोडल्यामुळे ज्याला हिंदुत्व प्रिय होतं, तो आमचा हक्काचा मतदार आमच्या हातून निसटला. उद्धव साहेबांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री म्हणून असलेल्या कारकिर्दीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागून हिंदुत्व सोडल्यामुळे घुसमटलेल्या असंख्य शिवसैनिकांना मिंध्यांची शिवसेना आपली वाटू लागली. बाळासाहेबांना ‘थेरडा’ म्हणणाऱ्या सुषमा अंधारेसारख्या आततायी नेत्या आम्ही (नाईलाजाने) पक्षात घेतल्या. जेव्हा त्या पक्षाच्या वतीने बोलू लागतात, तेव्हा तर मी नजर दुसरीकडे वळवतो किंवा टीव्ही बंद करून टाकतो.
आमची शिवसेना असो, नाही तर युवा सेना; बाळासाहेबांच्या काळात होणारी तरुण पोरांची भरती पार बंद झाली आहे. कारण, आम्ही हिंदुत्व सोडलं. आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या कुबड्या घेतल्याशिवाय, आम्हाला पर्याय नाही. पूर्वी ज्या ‘मातोश्री’वर अडवाणी, नरेंद्र मोदी, प्रणव मुखर्जी, अमित शहा यांच्यासारखे दिग्गज नेते यायचे, तिथे आता काँग्रेसकडून १०, जनपथचा निरोप घेऊन चेन्नीथला नावाचा कोणीतरी केरळी लुंगीवाला येतो किंवा ज्यांचे हात कारसेवकांच्या रक्ताने बरबटले आहेत, असे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातले आणि उत्तर प्रदेशातले परप्रांतीय नेते उद्धव साहेबांना भेटायला येतात. ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे’ यांच्या फोटोसमोर उभं राहून ते आपलं फोटो सेशन करतात. ते पाहून माझ्या हृदयात कालवाकालव होते. बाळासाहेबांची सगळी तपश्चर्या फुकट गेली, असं वाटू लागतं... राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीला तुम्ही दरवर्षी निर्मळ मनाने श्रद्धांजली वाहायला सुरुवात केली, पण राहुल गांधी मात्र चुकूनही स्वर्गीय बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहणं तर दूर, पण त्यांचा आदराने उल्लेखसुद्धा करत नाहीत. भक्त यालाच आपली ‘लाचारी’ म्हणतात. शिवसेनेला लाचार सेना आणि तुम्हाला लाचार सम्राट! भक्तांच्या भडीमारापुढे आम्ही हतबल होतो! ज्या उत्तर प्रदेश, बिहारच्या आमच्याच हिंदू बांधवांना आम्ही आयुष्यभर ‘परप्रांतीय भैय्ये’ म्हणून हिणवलं, त्यांचा राग राग केला. त्याच बिहारच्या परप्रांतीय चाराचोर भैय्याच्या घरी आमचे राऊतसाहेब पाहुणचार झोडायला गेले. ते बघून वाटतं, आपलं चुकलंच. एकदा हिंदुत्व स्वीकारल्यानंतर अन्य प्रांतातला आपला हिंदू बंधू परप्रांतीय कसा होऊ शकतो? फार तर तो ‘अन्य प्रांतीय’ होईल. इथे आम्ही मुंबईकर मराठी माणसाला जीव तोडून पटवून देतो, की मोदी-शहा हे दोघे गुजराती मुंबई, अंबानी, अदानीला विकायला निघाले आहेत आणि तिथे उद्धवसाहेब आणि त्यांचे कुटुंबीय २९ फेब्रुवारी २०२४ रोजी जामनगरला अनंत अंबानीच्या विवाहपूर्व सोहोळ्याला पोहोचले, कसा मतदार आमच्यावर विश्वास ठेवेल?
उद्धवसाहेब, प्रत्येक निवडणुकीच्या आधी आपण मुंबई तोडून गुजरातला जोडण्याचा मोदी-शहा यांचा डाव आहे, म्हणून नुसती बोंबाबोंब करतो. पण मुंबई गुजरातला जोडण्यासाठी अख्खा पालघर जिल्हा आणि थोडा ठाणे जिल्ह्याचा मीरा-भाईंदर भागदेखील गुजरातला जोडावा लागेल. हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का? असं भक्त विचारतात, तेव्हा मी अक्षरशः निरुत्तर होतो आणि त्यात तुमचा ‘मुकेसभाई’ समोर हात जोडून उभा राहिलेला फोटो सोशल मिडीयावर आला, की माझे हातपायच गळतात... या अटीतटीच्या, संघर्षाच्या काळात, पक्षप्रमुख म्हणून तुम्ही कधीच बाळासाहेबांसारखा बाणेदारपणा आणि तडफ दाखवली नाही. ‘फक्त माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, माझी निशाणी चोरली’ म्हणून रडगाणं गात राहिलात. मतदारांची सहानुभूती गोळा करण्याचा तो केविलवाणा प्रयत्न वाटत होता. डँबीस भक्त याच्यावर बिहारच्या चिराग पासवानचं उदाहरण देतात. त्याचं राजकीय सर्वस्व गेलं, पण तो राखेतून पुन्हा उभा राहिला. त्या बिहाऱ्याला जमलं, ते तुमच्या बिहाऱ्याला का जमत नाही? म्हणून आम्हाला खिजवतात. ‘वडील चोरीला गेलेत, तर पोलिसात तक्रार द्या’ म्हणून आमची टर उडवतात!
या काळात आम्हा शिवसैनिकांना मार्गदर्शन करायचं सोडून तुम्ही सत्ताधारी महायुतीला फक्त टोमणे मारत राहिलात. आज तुमची प्रतिमा ‘टोमणे सम्राट’ अशी झाली आहे. राऊतसाहेबांनी तुमच्या ‘सामना’साठी घेतलेल्या मुलाखती हा समाजात चेष्टेचा विषय झाला आहे. ‘प्रश्नपत्रिका पण तुम्हीच लिहिली होती, उत्तर पत्रिका पण तुमचीच आणि तपासणारेही तुम्हीच’, अशी भयंकर थट्टा होऊ लागली. उद्धवसाहेब, कामासाठी अलीकडेच मी ॲक्वालाईन मेट्रोने अंधेरीहून गिरगावला गेलो होतो... गर्दीच नशिबात असलेल्या मुंबईकरांना प्रवासाचं स्वर्गसुख म्हणजे काय असतं, ते या ॲक्वालाईन मेट्रोने प्रवास केल्याशिवाय कळणार नाही. भक्त मित्रांकडे या प्रवास सुखाचं वर्णन करण्याची पण आम्हाला चोरी झाली आहे. ‘तुझ्या स्थगिती सम्राट’ साहेबाने मेट्रो प्रकल्पाला स्थगिती दिली नसती, तर हे सुख केव्हाच अनुभवता आलं असतं.’ असं म्हणून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आधीच्या महायुती सरकारच्या विकासकामांना दिलेल्या स्थगितीची यादी घडाघडा म्हणून दाखवतात. तोंडात चप्पल मारल्यासारखी आम्हा सैनिकांची दयनीय स्थिती होते. ‘स्थगिती सम्राट’ म्हणून तुमची प्रतिमा भक्तांनी सोशल मीडियात अगदी व्यवस्थित रुजवली आहे. तिचा प्रतिवाद तरी कुठल्या तोंडाने करायचा?
मुंबई महापालिकेच्या कंत्राटांमध्ये टक्केवारी घेऊन नोटबंदीनंतरही तुम्ही टोलेजंग ‘मातोश्री २’ बांधलात. तुमची आणि आदित्यसाहेबांची निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेली मालमत्ता, स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क चौपाटीवरील तुम्ही ढापलेला महापौर बंगला, सचिन वाझेमार्फत मुंबईतून महिना शंभर कोटी खंडणी गोळा करण्याच्या आरोपामुळे हे लबाड भक्त तुमची प्रतिमा धुरंदरच्या रहमान डकैतच्या तालावर ‘महाराष्ट्राचा डकैत’म्हणून उभी करतात आणि जनतेला प्रथमदर्शनी त्यात तथ्य दिसत असल्यामुळे जनता विश्वास ठेवते आणि आम्हाला त्याचा प्रतिवादही करता येत नाही. कोरोना काळात तुम्ही देशातील ‘बेस्ट मुख्यमंत्री’ असल्याचे सर्व्हे येत होते. हे सगळे पेड सर्व्हे होते. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी स्वतःच स्वतःला भारतरत्न पुरस्कार दिला होता. त्यातलाच हा ‘बेस्ट मुख्यमंत्री’ पुरस्कार होता, अशी भक्तांनी नुसती राळ उडवून दिली होती.
हिंदुत्व सोडल्यामुळे आमचा नाराज झालेला कार्यकर्ता आणि मतदार जेव्हा आमच्या हातातून निसटला, तेव्हाच आम्ही ही लढाई हरलो होतो. तोपर्यंत २०२४ च्या विधानसभा निवडणुका आल्या. महाविकास आघाडीत ३ मुख्य पक्ष असल्यामुळे आमच्या वाट्याला जेमतेम ८५ जागा आल्या त्याही मिळवण्यासाठी आम्हाला काय लाचारी पत्करावी लागली, हे दाखवणारा हा फोटो भक्तांनी सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल केला. महाविकास आघाडी करूनही आमचे अवघे २० आमदार निवडून आले. तेव्हा भक्तांनी हे असले फोटोशॉप करून आमची पार चामडीच उतरवली. त्यांना प्रत्युत्तर तरी कोणत्या तोंडाने देणार?
आज देशाच्या लोकसभेत आमचे ९, तर राज्यसभेत ३ खासदार आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत २० आमदार उरले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी आम्हाला महायुती सरकारकडे भीक मागावी लागते आहे. पुढच्या वेळी विधानसभेतून राज्यसभेवर १ खासदार पाठवण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळदेखील आमच्याकडे राहिलेले नाही. मुंबई महापालिकेला तर पानिपत होण्याचीच भीती वाटते आहे. ज्या मनसेचे आदित्यसाहेबांनी ‘संपलेला पक्ष’ म्हणून धिंडवडे काढले, त्याच मनसेसमोर आघाडी करण्याची नामुष्की आपल्यावर ओढवली आहे. खरं म्हणजे, आता आमच्याकडे काहीच उरलेलं नाही. तरीही मी उद्धव साहेबांबरोबर आहे. कारण मी बाळासाहेबांचा कट्टर मुंबईकर शिवसैनिक आहे.
आता आमच्याकडे काय उरलं आहे?
उरल्या आहेत त्या स्वर्गीय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या तेजस्वी आठवणी.
बाळासाहेबांच्या कट्टर मुंबईकर शिवसैनिकांचा
रडणारा अंतरात्मा आणि अंधःकारमय भविष्य!
जय महाराष्ट्र!!
(समाप्त)






