Sunday, January 11, 2026

Audi Car Accident : जयपूरमध्ये भरधाव ऑडीने १६ जणांना चिरडलं, रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांना उडवले; १६ जण जखमी, एकाचा जागीच मृत्यू

Audi Car Accident : जयपूरमध्ये भरधाव ऑडीने १६ जणांना चिरडलं, रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांना उडवले; १६ जण जखमी, एकाचा जागीच मृत्यू

जयपूर : राजस्थानातील जयपूरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एका लक्झरी ऑडी कारने भीषण धुमाकूळ घातला. जर्नलिस्ट कॉलनीतील खरबास सर्कलजवळ हा भीषण अपघात घडला असून, यामध्ये एकूण १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. कारच्या धडकेमुळे खाद्यपदार्थांच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, तिथे उभे असलेले नागरिक आणि पादचारी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दुर्दैवाने, या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा थरार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

नजरधव वेगात कार आली अन् थेट..

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेले अनुभव अंगावर शहारे आणणारे आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर ही कार केवळ थांबली नाही, तर तब्बल ३० मीटरपर्यंत रस्त्यावर मृत्यूचे तांडव करत पुढे गेली. ऑडी कारचा वेग इतका प्रचंड होता की, सुरुवातीला ती एका मोठ्या दुभाजकाला (डिव्हायडर) धडकली. मात्र, या धडकेनंतरही कार थांबली नाही. उलट, नियंत्रण सुटलेली ही कार पुढील ३० मीटरपर्यंत फरफटत गेली. या वेगात तिने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या १२ हून अधिक गाड्यांना (दुचाकी आणि चारचाकी) जोराची धडक दिली. ज्यावेळी हा अपघात झाला, तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर अनेक नागरिक रात्रीची खादाडी करत बसले होते. कोणाला काही समजण्याच्या आत ही भरधाव कार थेट या लोकांमध्ये घुसली. खादाडी करत असलेल्या अनेक लोकांना कारने जोरदार धडक दिली, तर काही जण गाड्यांखाली चिरडले गेले. रस्ताभर विखुरलेले साहित्य आणि जखमींचा आक्रोश यामुळे परिसरातील वातावरण सुन्न झाले होते.

ऑडी कार जप्त करण्यात आली...

जखमींना प्राथमिक उपचारासाठी तात्काळ जयपुरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मुहाना पोलीस घटनास्थळी पोहोचले. ऑडी कार जप्त करण्यात आली आहे आणि तपास सुरू आहे. अपघातातील ऑडी कारचा नोंदणी क्रमांक दमण-दीव असल्याचे सांगितले जात आहे.

मृताची ओळख पटली, ४ जणांची मृत्यूशी झुंज

जर्नलिस्ट कॉलनीतील भीषण ऑडी कार अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती आणि मृतांची ओळख यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रमेश बैरवा यांचा जयपूरिया रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून, पोलिसांनी याला अधिकृत दुजोरा दिला आहे. या दुर्घटनेतील ३ ते ४ जखमींची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. अपघातानंतर तातडीने मदतकार्य राबवण्यात आले. जखमींपैकी ८ जणांना तातडीने जयपूरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ४ जखमींना त्यांच्या नातेवाईकांनी अधिक चांगल्या उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात हलवले आहे, तर ४ जणांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आले. जे रुग्ण गंभीर आहेत, त्यांना एसएमएस (SMS) हॉस्पिटल आणि जयपूरिया हॉस्पिटलमध्ये विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्या १५ हून अधिक लोकांची नावे समोर आली आहेत, ज्यात पारस मोदी, मृदुल लोहार, राकेश, राजेंद्र खरोल, दीपक, हेमराज, मोहरी लाल मीना, रवी जैन, प्रकाश, आशिष, दिवाण, राजेश, देशराज आणि चमन जैन यांचा समावेश आहे. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने एफएसएल (FSL) टीमला पाचारण केले आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे कारचा वेग किती होता आणि अपघाताचे नेमके तांत्रिक कारण काय होते, हे स्पष्ट होईल. पोलिसांनी सध्या परिस्थिती नियंत्रणात आणली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment