मुंबई : परिवर्तन कोणी केलं ? विकासकामं कोणी केली ? हे मुंबईकरांना व्यवस्थित माहिती आहे. मुंबईत मेट्रो आणि रस्त्यांचे विस्तृत जाळे निर्माण करण्याचे काम कोणी केले याची मतदारांना माहिती आहे. यामुळे मुंबईच्या विकासाकरिता मतदार भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते अंधेरी येथे मुंबई महापालिकेसाठी घेतलेल्या प्रचारसभेत बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभेत बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांचा जन्म मुंबईत झाला नाही असे ते सांगतात, पण पुण्यात जन्म झाला असूनही मुंबईकरांचे प्रश्न बाळासाहेब ठाकरेंना व्यवस्थित समजत होते. मुंबईत जन्मलेल्यांना मात्र म्हातारे झाले तरी मुंबईकरांसाठी काही कामं करणं जमलेलं नाही. माझी जन्मभूमी मुंबई नसली तरी कर्मभूमी मुंबईच आहे. यामुळे मुंबईकरांचे प्रश्न सोडवणार, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अंधेरीच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासाचा रोडमॅप थोडक्यात सादर केला. कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, झोपडपट्टीमुक्त मुंबई, आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारी उत्तम कनेक्टिव्हिटी या संदर्भात त्यांनी थोडक्यात माहिती दिली. पुढच्या सात वर्षांत मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर त्यांनी 'कन्फ्युजन आणि करप्शन युनायटेड' अशा शब्दांत टीका केली. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, हा विरोधकांचा दावा फेटाळत मुख्यमंत्र्यांनी मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे आणि राहील अशी ग्वाही दिली.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाने मुंबई महापालिकेत सत्ता असताना विकास करण्याऐवजी भ्रष्टाचार केले. कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले. पण आम्ही मुंबईकरांच्या भल्यासाठी काम केलं आणि करत राहणार, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी घोटाळेबाजांवर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
मुंबईकरांचा प्रवास वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी करणार
मुंबईत मेट्रो आणि रस्त्यांचे विस्तृत जाळे निर्माण करणार
मुंबईत लवकरच जलवाहतूक सुरू करणार
धारावीचा आणि बीडीडी चाळींचा पुनर्विकास करणार
धारावीकरांना धारावीतच घर देणार
मुंबईकरांचे मुंबईतल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार
विकास करुन मुंबईत परिवर्तन करणार






