मुंबई : मनात जय श्रीराम म्हणा आणि मतदान करा. मुंबईचा रंग बदलू द्यायचा नसेल तर जय श्रीराम म्हणणारे नगरसेवक निवडून द्या असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले. ते मुंबई महापालिका निवडणुकीसाठी चांदिवलीच्या संघर्ष नगरमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत बोलत होते.
चांदिवली मध्ये येण्याची वेगळी मजा आहे कारण इथे आजूबाजूला हिरवे साप वळवळतात, असे सूचक वक्तव्य नितेश राणेंनी केले. नितेश राणेंच्या या वक्तव्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सभेत बोलताना वॉर्डाच्या विकासाला काहीही कमी पडू देणार नाही, अशी हमी मंत्री नितेश राणे यांनी दिली. प्रचारसभेत बोलताना त्यांनी उद्धव आणि राज यांच्यावर सडकून टीका केली. हिंदू मतांमध्ये फूट पाडण्यासाठी उद्धव आणि राज एकत्र आले आहेत. मुंबईचा रंग बदलू द्यायचा नसेल तर मतांमध्ये फूट पाडून चालणार नाही. एकजुटीने उभे राहा आणि जय श्रीराम म्हणणाऱ्या नगरसेवकांना निवडून द्या, असे नितेश राणे म्हणाले.
राज्यात देवाभाऊंचे सरकार आहे. कोणी मुंबईवर राज्य करण्याचं स्वप्न बघत असेल आणि त्यासाठी इथे राहणाऱ्या सामान्य मुंबईकरांवर हात उगारत असेल तर त्याला परिणाम भोगावे लागतील. जो हात तुमच्यावर उठेल तो हात आम्ही ठेवणार नाही हा शब्द देतो, असे नितेश राणे म्हणाले. त्यांनी मुंबई भलत्यांच्या हाती जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन मतदारांना केले. मुंबई वर सत्ता ही आय लव महादेव वाल्यांचीच असायला पाहिजे आणि त्यासाठी तुमचे ही योगदान असायला हवे. मनात जय श्रीराम म्हणा आणि मतदान करा. मुंबईचा रंग बदलू द्यायचा नसेल तर जय श्रीराम म्हणणारे नगरसेवक निवडून द्या असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.
हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन नितेश राणेंनी केले. ज्याला महादेव आवडतात तोच मुंबई महापौर पदावर बसेल असा विश्वास त्यांनी सभेत बोलताना दिला. विकासासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहनही नितेश राणेंनी मतदारांना केले.






