Friday, January 9, 2026

मी बाळासाहेबांचा मुंबईकर शिवसैनिक बोलतोय... भाग २

मी  बाळासाहेबांचा मुंबईकर शिवसैनिक बोलतोय... भाग २
मिलिंद रघुनाथ पोतनीस शिवसेनेचं हिंदुत्व बावनकशी सोन्यासारखं झळाळून निघालं. आमचे साहेब अनभिषिक्त ‘हिंदुहृदयसम्राट’ झाले. भाजपवाले, विशेषतः प्रमोद महाजन युतीसाठी ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवू लागले. साहेब तर माझ्या गळ्यातील ताईत झाले... वसंतदादा पाटील यांच्या एका वाक्याने मुंबई महापालिका शिवसेनेच्या पदरात पडली. पण पुन्हा एकदा आमचे कावेबाज विरोधक शिवसेनेला ‘वसंत सेना’ म्हणून हिणवू लागले. पण, मी त्यांना कधीच भीक घातली नाही. त्या निवडणुकीत फक्त २५% मतदान झालं होतं, त्याचा फायदा शिवसेनेला झाला. असले पोरकट आरोप करणाऱ्या दळभद्री विरोधकांना ‘बाकीच्या ७५% ना मतदान करण्यापासून आम्ही थांबवलं होतं का?’ असा रोखठोक प्रश्न विचारून मी आजही निरुत्तर करतो. त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ माझगाव मतदारसंघातून ‘मशाल’ चिन्हावर निवडून येऊन एकमेव आमदार झाले. कारण तोपर्यंत शिवसेनेला स्वतःचं अधिकृत असं चिन्ह नव्हतं. उमेदवारांची नोंद ‘अपक्ष’ अशीच व्हायची. पुढे १९९१ साली याच छगन भुजबळांनी चुकलो, ‘लखोबा लोखंडे’ने साहेबांशी आणि शिवसेनेशी गद्दारी करून आमच्या १८ आमदारांना बरोबर घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी माझी तळपायाची आग मस्तकाला गेली. ज्या साहेबांनी, ज्या शिवसेनेने तुम्हाला मुंबईचं महापौर केलं, आमदार म्हणून निवडून आणलं, त्या साहेबांशी आणि पक्षाशी गद्दारी करताना छगन भुजबळ यांना काहीच कसं वाटलं नाही? मनातल्या मनात मी त्यांच्या तोंडावर थुंकलो होतो. सत्ताधारी काँग्रेसमध्ये गेल्यामुळे शिवसैनिकांनी थोडं नमतं घेतलं नाहीतर आम्ही भुजबळांना आमच्या भुजातील बळ नक्की दाखवलं असतं. पुढे बराच काळ छगन भुजबळ यांचं ‘लखोबा लोखंडे’ हे टोपण नाव खूप प्रसिद्ध झालं होतं. साहेबांनी हिंदुत्वाचा वसा घेतल्यानंतर मात्र माझ्या शिवसेनेला सोन्याचे दिवस येऊ लागले. शिवसेनाप्रमुखांपासून नेते व उपनेते, सचिव, प्रवक्ते, शाखाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, विभाग प्रमुख, विभाग उपप्रमुख, गटप्रमुख अशी श्रेणीबद्ध संघटनात्मक रचना सक्रिय करण्यात आली. एवढंच नव्हे, शिवसेनेची महिला आघाडीदेखील सक्रिय झाली. खूप मोठ्या संख्येने आमच्या माता- भगिनी शिवसेनेचं काम सक्रियतेने करू लागल्या. महाराष्ट्रात गावोगाव शिवसेनेच्या शाखा उघडू लागल्या. शिवसेनेचा भगवा आणि साहेबांची पोस्टर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झळकू लागली. शिवसेना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रव्यापी झाली! मात्र, १९८७ सालाने शिवसेनेच्या ‘हिंदुत्वा’ला सोन्याची झळाळी लाभली. १९८७ साली काँग्रेसचे विलेपार्ले येथील आमदार हंसराज भुग्रा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत काँग्रेसतर्फे दिग्गज प्रभाकर कुंटे यांना उमेदवारी दिली गेली. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर शंकरराव चव्हाण यांच्यासारखे कडक हेडमास्तर होते. अब्दुल रहमान अंतुले यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील शिवसेना आणि काँग्रेसचे मधुर संबंध संपुष्टात आले होते. बाळासाहेबांनी काँग्रेसच्या थेट विरोधात भूमिका घेतली होती. पार्ले येथील या निवडणुकीसाठी साहेबांनी मुंबईचे महापौर असलेल्या रमेश प्रभू यांची निवड केली आणि निवडणूक घोषणा दिली ‘गर्व से कहो, हम हिंदू है’. साहेबांच्या भाषणाची सुरुवातच ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू, बंधू-भगिनी आणि मातांनो’ अशी व्हायची आणि सगळी सभा चैतन्याने भारून जायची. आता उत्तर प्रदेश, बिहारचे सगळे भय्ये आणि मद्रासी आमच्यासाठी ‘परप्रांतीय हिंदू’ झाले होते. बाळासाहेबांच्या भगव्या कपड्यांनी, हातातल्या रुद्राक्षांनी, भारदस्त आवाजात मांडलेल्या कडव्या हिंदुत्वाने अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेवर गारुड केलं. भाजपचा पाठिंबा त्यावेळी धर्मनिरपेक्ष जनता पक्षाला होता. जनता पक्षाचे प्राणलाल व्होरा, काँग्रेसचे प्रभाकर कुंटे आणि शिवसेनेचे रमेश प्रभू अशी ही तिरंगी लढत होती. साहेब आणि रमेश प्रभू या दोघांनीही थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जाहीर सभांमधून मते मागितली होती. भाजपचा जनता पक्षाला पाठिंबा असला तरी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते या निवडणुकीत शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करत होते. या सगळ्या झंझावातामुळे आमच्या रमेश प्रभू यांनी निवडणूक जिंकली. निवडणुकीच्या विरोधात प्रभाकर कुंटे यांनी उच्च न्यायालयात लोकप्रतिनिधी कायद्यान्वये दावा ठोकला कुंटे यांची बाजू उचलून धरताना प्रभू यांनी निवडणूक रद्दबातल झालीच, शिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी धर्माच्या नावावर मतं मागितल्याने त्यांचा मतदानाचा अधिकार ६ वर्षांसाठी (१९९९ ते २००५) काढून घेतला गेला. दुसरीकडे रमेश प्रभू यांनाही ६ वर्षे निवडणूक लढविण्यावर बंदी आली. पण, शिवसेनेचं हिंदुत्व बावनकशी सोन्यासारखं झळाळून निघालं. आमचे साहेब अनभिषिक्त ‘हिंदुहृदयसम्राट’ झाले. भाजपवाले, विशेषतः प्रमोद महाजन युतीसाठी ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवू लागले. साहेब तर माझ्या गळ्यातील ताईत झाले. आता आमची सेना महाराष्ट्रव्यापी पक्ष झाला आणि पक्षाला निवडणूक आयोगाकडून ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळालं. २३ जानेवारी १९८८ रोजी साहेबांनी ‘सामना’ नावाचं मुखपत्र सुरू केलं. आता शिवसैनिकांच्या तसेच मराठी माणसाच्या आवाजाला एक हक्काचं वर्तमानपत्रंच पाठबळ मिळालं होतं. त्यादिवशी मला कोण आनंद झाला. त्याहीपेक्षा आनंद तेव्हापासून आजपर्यंत एकही दिवस सामना वृत्तपत्र निघालं नाही, असं झालेलं नाही याचा होतो. याच ‘सामना’मुळे शिवसेनेला संजय राऊत नावाचा हिऱ्यासारखा प्रवक्ता मिळाला. त्यांच्या अभिजात मराठीतील आणि ठाकरे शैलीतील रोखठोक अग्रलेख आम्हाला अवर्णनीय आनंद मिळवून देऊ लागले. साहेबांनी पुढे संजय राऊतांना राज्यसभेवर पाठवलं. शिवसेनेने अशी कात टाकल्यावर पुढच्याच वर्षी, १९८९ साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत शिवसेनेचे ३० नगरसेवक निवडून आले. दुसरीकडे कॉंग्रेसने स्थानिक पातळीवर आगरी सेनेसोबत युती केली. बहुमत शिवसेनेकडेच होतं. त्यामुळे शिवसेनेचा महापौर ठाणे महानगरपालिकेत येणार, असं स्पष्ट चित्र होतं. बाळासाहेबांनी या महापौरपदासाठी होणाऱ्या निवडणुकीची जबाबदारी सतीश प्रधान आणि आनंद दिघेंकडे दिली होती. प्रकाश परांजपे हे शिवसेनेकडून महापौरपदासाठी उमेदवार होते. मात्र महापौरपदासाठी निवडणूक झाली आणि अवघ्या एका मताने सेनेचं महापौरपद हुकलं. उपमहापौरपदासाठी देखील शिवसेनेला आपला उमेदवार विजयी करता आला नाही. सेनेच्या २ नगरसेवकांनी आपलं मत विरोधात टाकलं होतं... त्यामुळे ‘गद्दार कोण’, याची चर्चा ठाण्यात सुरू होती. ठाण्यातील वातावरण तणावाचं असतानाच या निवडणुकीच्या महिन्याभरातच भर दिवसा शिवसेनेचे ‘गद्दार’ नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या झाली. या हत्येने ठाण्यातच नव्हे, महाराष्ट्रभर खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी आनंद दिघे यांच्यासह ५२ शिवसैनिकांना अटक केली. आनंद दिघेंच्या अटकेच्या निषेधार्थ ‘ठाणे बंद’ करण्यात आला. या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या प्रकरणाने संपूर्ण शिवसेनेत एक कडक संदेश गेला. ‘पक्षाशी गद्दारी की एक ही सजा, सर तन से जुदा!’ मग तो मराठी, असो की हिंदू!. आमच्या दृष्टीने गद्दार म्हणजे ‘काफीर’च. आणि त्याची एकच शिक्षा. सर तन से जुदा. शिवसैनिकांचा हा स्वाभिमानी बाणा त्यावेळी मला खूप भावला होता. १९८९ साली झालेल्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत साहेबांनी दूरदृष्टीने भाजपशी केलेल्या युतीचा निर्णय सेनेसाठी किती फायदेशीर होता याचा अनुभव आला. आपला पहिला हक्काचा खासदार मिळाला. उत्तर मध्य मुंबईतून सेनेचे विद्याधर गोखले सेनेच्या ‘धनुष्यबाणावर’ विजयी झाले. सेनेच्या हिंदुत्वाचा हुंकार देशाच्या संसदेत गरजला. त्यावेळी अवघ्या महाराष्ट्रातला शिवसैनिक मनोमन आनंदला होता. मागोमाग १९९० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीला पहिल्यांदा अभूतपूर्व यश लाभलं. शिवसेनेने पक्ष म्हणून आपल्या धनुष्यबाण चिन्हावर पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत १८३ जागा लढवून ५२ जागा जिंकल्या आणि आमच्यामुळे भाजपला १०४ जागा लढवून ४२ जागा मिळाल्या. अर्थात् आता युतीत आम्ही ‘मोठे भाऊ’ झालो होतो. (तुम्ही १८३ जागा लढवून ५२ जागा जिंकलात आणि आम्हाला १०४ दिल्यात. त्यात आम्ही ४२ जिंकल्या. टक्केवारी काढून बघ. असली फालतू बकवास करणाऱ्या आगाऊ भाजपवाल्यांना राजकारणात टक्केवारी चालत नाही फक्त जिंकलेल्या जागा बोलतात, हे कोण सांगणार?) शिवसेनेचे मनोहर जोशी विरोधी पक्षनेते झाले. भाजपवाल्यांसमोर आम्ही छाती पुढे काढून चालू लागलो. या ५२ आमदारांबरोबरच शिवसेनेचे वाघ राज्यसभेत पोहोचण्यासाठी दरवाजे खुले झाले होते. आता शिवसेना ‘सर्वव्यापी’ होऊ लागल्यामुळे आमचा आनंद गगनात मावत नव्हता. पाठोपाठ १९९१ साली परत लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या. सेना-भाजप युती आता आणखी घट्ट झाली. या निवडणुकीत आमच्या हिंमतीवर आमचे १ चे ४ वाघ झाले. आमच्यामुळे भाजपचे ५ उमेदवार निवडून आले. पण, हे नमकहराम भाजपवाले कधीच मान्य करत नाहीत. अल्पमतातील काँग्रेस सरकारचे नरसिंह राव पंतप्रधान झाले. एव्हांना साहेबांच्या हिंदुत्वाचा डंका गोदावरी ओलांडून थेट उत्तर प्रदेशातल्या गंगेच्या खोऱ्यात वाजत होता. १९९१ च्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आमचा पवन पांडे नावाचा वाघ आंबेडकरनगर जिल्ह्यातल्या अकबरपूर विधानसभा मतदारसंघातून सेनेचा भगवा घेऊन उत्तर प्रदेश विधानसभेत पोहोचला. मी तर अत्यानंदाने दोन-चार वेळा हळूच ‘जय हिंद -जय महाराष्ट्र -जय उत्तर प्रदेश’च्या घोषणापण दिल्या. पुढे या परप्रांतीयाने साहेबांशी गद्दारी केली. चक्क मायावतींच्या बहुजन समाज पार्टीत गेला. पण ४ वेळा विधानसभा आणि २ वेळा लोकसभा लढवून त्याला एकदाही विजय मिळवता आला नाही. साहेबांचे आणि शिवसैनिकांचे शाप त्याला बाधले असंच मी मानतो. ‘शेवटी भय्या तो भय्या, आपल्या जातीवर गेला’ म्हणून आम्ही शिवसैनिकांनी त्या पांड्याला खूप शिव्या घातल्या. १८ ऑक्टोबर १९९१ रोजी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. शिवसेनेच्या या मेळाव्यात साहेबांनी २८ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेला विरोध करून भारत-पाकिस्तान सामन्याच्यावेळी ‘मुंबई बंद’ करण्याचा इशारा दिला. त्याकाळी ‘मुंबई बंद’ फक्त दोघेच जण करू शकत असत. एकतर बाळासाहेबांची शिवसेना किंवा पाऊस. पण आमचे कट्टर सैनिक शिशिर शिंदे कुठे ऐकायला? शिशिर शिंदे हे काही कार्यकर्त्यांसह वानखेडे स्टेडियममध्ये घुसले आणि त्यांनी खेळपट्टी उखडून टाकली. ते यावरच थांबले नाहीत. त्यांनी खेळपट्टीवर इंजिन ऑईलही टाकलं. त्यामुळे सामनाच रद्द करावा लागला. त्यानंतर साहेबांनी शिशिर शिंदे यांना महापालिकेत नगरसेवक म्हणून पाठवलं. त्यांचं गाजलेलं आणखी एक आंदोलन म्हणजे १९९० च्या दशकात सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना तेल टंचाईचा सामना करावा लागला होता. शिशिर शिंदे यांनी थेट ‘धारा’ तेलाचे ट्रक अडवून त्याचं सर्वसामान्यांना वाटप केलं होतं. पुढे २००६ साली शिशिर शिंदे शिवसेनेशी गद्दारी करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सामील झाले. साहेबांनी पाठीवर हात ठेवलेले, मोठे केलेले शिवसैनिक पक्षाशी गद्दारी का करतात? कशी करू शकतात? हे मला आजपर्यंत न सुटलेलं कोडं आहे. १२ वर्षांनी आपली चूक कळल्यावर हेच शिशिर शिंदे २०१८ साली पुन्हा शिवसेनेत आले. असो... तोपर्यंत शिवसेनेच्या राजकीय आयुष्यातील एक सोनेरी पान असलेलं १९९२ वर्ष आलं. राम जन्मभूमी आंदोलनाचं. शिवसेना सुरुवातीपासूनच राम जन्मभूमी आंदोलनाची कट्टर समर्थक होती. अनेक शिवसैनिकांनी १९९२ मधील ‘कार सेवे’मध्ये भाग घेतला होता. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितलं होतं,‘जर शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल, तर मला त्याचा अभिमान आहे.’ या भूमिकेमुळे शिवसेनेला सबंध देशात हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ठोस ओळख मिळाली. विशेषतः विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घ्यायला तयार नसताना, आमच्या साहेबांनी दाखवलेला बाणेदारपणा हिंदू समाजाला खूप भावला. बाळासाहेब त्यांच्या भाषणात जाहीरपणे उघड उघड, मुस्लीम आतंकवाद, त्यांची जिहादी मानसिकता, त्यांचा देशद्रोह या सगळ्यावर प्रचंड घणाघात करत होते. आम्ही त्यावेळी प्रचंड जल्लोष करत असू. पाठोपाठ आल्या... १९९२/९३ च्या मुंबईतील हिंदू-मुस्लीम दंगली आणि बॉम्बस्फोट. बाबरी मशीद पाडल्याचं निमित्त साधून, मुंबईत हिंदू-मुस्लिमांच्या पूर्वनियोजित दंगली व बॉम्बस्फोट घडवण्यात आले. जोगेश्वरीच्या राधाबाई चाळीत ६, बहुतेक मराठी हिंदू माता, बंधू-भगिनींना मुसलमानांनी जिवंत जाळलं. मग मात्र मराठी हिंदू समाजाचा संयम सुटला. मुंबईत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आणि सुमारे ९०० लोक, मुख्यतः मुस्लीम, मारले गेले. त्यामुळे मुंबईत मोठा धार्मिक तणाव निर्माण झाला होता. मुंबईत देशद्रोही दाऊद इब्राहिमने १२ बॉम्बस्फोट घडवले. २५७ बहुतांशी निरपराध हिंदू नागरिक मारले गेले. हजारो निरपराध हिंदू जखमी आणि कायमचे अपंग झाले. शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता उद्ध्वस्त झाली. पण मुंबईकरांना एकच आधार होता. साहेब आहेत. आणि साहेबांची शिवसेना आहे. त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी तर खोटेपणाची हद्द केली होती. ‘मुस्लीम वस्तीत १३ वा बॉम्बस्फोट झाला आहे’, असं खोटंच जनतेला सांगितलं होतं. बाळासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या ‘नीच प्रवृत्ती’चा त्यांनी परिचय करून दिला होता. या दंगलींच्या चौकशीसाठी नेमलेल्या न्या. श्रीकृष्ण आयोगाने ‘८ जानेवारी १९९३ पासून शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी मुस्लिमांवर आणि त्यांच्या मालमत्तांवर सुनियोजित हल्ले केले. शिवसेनेच्या शाखांनी स्थानिक कमांड सेंटर म्हणून काम केले आणि हल्लेखोरांनी मतदारांच्या याद्या घेऊन मुस्लिमांच्या मालमत्ता लक्ष्य केल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘अनुभवी सेनापतीप्रमाणे’ आपल्या निष्ठावान शिवसैनिकांना मुस्लिमांवर हल्ला करून ‘बदला’ घेण्याचे आदेश दिले,’ असे निरीक्षण नोंदवले होते. ही साहेबांच्या आणि शिवसैनिकांच्या कर्तबगारीची पोचपावती होती. साहेबांचा आदेश म्हणजे शिवसैनिकासाठी अंतिम शब्द असल्यामुळे त्यांनी दाखवलेल्या क्षात्रतेजाने मुंबईचा हिंदू वाचला, अशीच माझी व असंख्य मुंबईकर मराठी आणि परप्रांतीय हिंदूंची भावना झाली होती. विशेषतः हिंदू अल्पसंख्याक असलेल्या (म्हणजेच मुस्लीम बहुसंख्य असलेल्या) वस्त्यांमध्ये शिवसेना ही तिथल्या हिंदू माणसाला, समाजाला आधार ठरली. खरं म्हणजे, श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालानुसार साहेबांवर आणि शिवसेनेवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी होती. पण कोणत्याच काँग्रेसच्या सरकारची ती हिम्मत झाली नाही. हा होता आमच्या साहेबांचा रुबाब आणि दरारा! आता शिवसेना ही मुंबईकरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या समाजजीवनाचा अविभाज्य घटक बनली होती. मुंबईतील परप्रांतीय हिंदूंसाठी; विशेषतः हिंदी भाषिकांसाठी ‘दोपहर का सामना’ १९९३ मध्ये सुरू झाला. त्यामुळे, शिवसेनेला व्यापक जनसमर्थन मिळवता आलं. संजय निरूपम या परप्रांतीय हिंदू शिवसैनिकाचा चेहरा शिवसेनेला मिळाला. पुढे साहेबांनी या संजय निरूपमला राज्यसभेवरदेखील पाठवलं. पण, बहुधा २००५ साली परत राज्यसभेची खासदारकी न मिळाल्यामुळे हा हरामखोर बिहारी काँग्रेसमध्ये गेला. प्रबोधनकार ठाकरे यांचं एक पुस्तक दाखवून, त्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे; ठाकरे कुटुंब हे मूळ बिहारचं, ते बिहारहून महाराष्ट्रात आल्याचा दाखला देत फिरत होता. त्यावेळी भक्तांच्या टोमण्यांना तर ऊत आला होता. तो हरामखोर संजय निरुपम त्यांच्यासाठी हिरो झाला होता. आज ठाकरे कुटुंबाला ‘बिहारी’ म्हणणं याच्यासारखं दुसरं पाप नाही, अशीच आमच्या शिवसैनिकांची भावना होती. याच दरम्यान नरसिंह राव यांच्या अल्पमतात असलेल्या सरकारला ३ अविश्वासाच्या ठरावांना सामोरं जावं लागलं. त्यापैकी जुलै १९९३ मध्ये भाजपने आणलेल्या अविश्वासाच्या ठरावाच्यावेळी आमचे खासदार मोहन रावले यांनी पोट बिघडल्याचं कारण सांगितलं आणि मतदान चुकवल्याने सरकार अल्प मताने बचावलं. काही बदमाश विरोधकांनी मोहन रावले यांच्या घरासमोर लाऊड स्पीकर लावून, ‘पाणीच पाणी चहूकडे, गं बाई गेला मोहन कुणीकडे?’ हे गाणं लावलम होतं. मला मोहन रावले यांचा मनातून राग आला होता. पण, साहेबांना त्यांचा राग आला नाही म्हणून माझाही राग कुठच्या कुठे पळून गेला! १९९५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने शिवसेना-भाजप युतीच्या पारड्यात भरभरून मतं टाकली. सेना-भाजप युतीला १३८ जागा मिळाल्या. १६९ जागा लढवून आमचे ७३ आमदार निवडून आले, तर भाजपने ११६ जागा लढवल्या आणि त्यांचे ६५ आमदार निवडून आले. (यावेळी देखील मोठा भाऊ आम्हीच ठरलो. काही दळभद्री भाजपवाल्यांना हे अजूनही पटत नाही. आपलं अपयश झाकण्यासाठी ते स्ट्राईक रेट काढायला सांगतात) बहुमताला कमी पडणाऱ्या जागा अपक्षांच्या मदतीने आम्ही पूर्ण केल्या आणि ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री या न्यायाने शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी सरांनी शपथ घेतली. त्यांचा शपथविधी सोहळा १४ मार्च १९९५ रोजी जिथे दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो, त्या शिवाजी पार्क, दादर येथे आयोजित करण्यात आला होता. सर्वसामान्य शिवसैनिकालाही या सोहळ्यात सहभागी होता यावं, म्हणून शपथविधी राजभवनावर न करता शिवाजी पार्कात करण्यात आला. लाखो शिवसैनिकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. तो सोहळा डोळे भरून बघितला. सोन्याला सुगंध यावा तसा हा सोहळा होता. थोडे दिवस माझ्यासह प्रत्येक शिवसैनिकाला आपणच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालो आहोत, असा भास होत होता. असे होते आमचे साहेब. शिवसैनिकावर जीवापाड प्रेम करणारे. त्यांची काळजी घेणारे. पण एवढे अफाट यश मिळूनही आपण स्वतः निवडणूक लढवावी, सत्तेत सहभागी व्हावं असं साहेबांना कधीच वाटलं नाही. ते नेहमी ‘किंग मेकर’च्या भूमिकेत राहिले. त्यामुळे त्यांच्याविषयीचा मला वाटणारा आदर शतगुणित झाला होता. माधुकरी मागणारा एक मुलगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवण्याची किमया फक्त आमचे बाळासाहेबच करू शकत होते. त्या मंत्रिमंडळात गृह आणि अर्थ यासारखी दोन महत्त्वाची खाती, आम्ही मोठा भाऊ असूनही धाकट्या भावाच्या, अर्थात भाजपच्या हातात दिल्याचं दुःख मला अजूनही होतं. विक्रम आणि वेताळातल्या गोष्टीतल्या वेताळासारखा हा भाजप सेनेच्या मानगुटीवर कायमचा बसला आहे, याचा मला संताप येत असे (मला तर काही वेळा प्रमोद महाजनांनी साहेबांवर वशीकरणाचा जादूटोणा करून त्यांना भारून टाकले होते का अशी शंका येते.) पण त्याचवेळी साहेबांच्या दिलदार वृत्तीचा दाखला देखील मिळतो. युती टिकवण्यासाठी आमच्या साहेबांनी केलेला हा त्याग होता. कद्रु वृत्तीच्या भाजपने कधी त्याची कदर केल्याचं मला आठवत नाही. तेव्हा महाराष्ट्रात भाजपला कोण विचारत होतं? शिवसेनेमुळे आणि साहेबांमुळे महाराष्ट्रात भाजप वाढला हे समीकरण आम्हां शिवसैनिकांच्या डोक्यात तेव्हापासून घट्ट बसलं ते कायमचंच. याच विधानसभा निवडणुकीत आमच्या ढाण्या वाघ बाळा नांदगावकरांनी ‘लखोबा लोखंडे’ला मुंबईच्या माझगाव मतदारसंघात आसमान दाखवलं. पुढे हेच बाळा नांदगावकर २००६ साली साहेबांशी आणि पक्षाशी गद्दारी करून साहेबांच्या डोळ्यांदेखत राज ठाकरे यांचा हात धरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेले. तेव्हा मी बाळा नांदगावकरला मनातल्या मनात अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली होती. पुढे १९९७ साली झालेल्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत आमचे ६ खासदार निवडून आले, तर युतीधर्म पाळून आम्ही मित्र पक्षाचे म्हणजे भाजपचे चार खासदार निवडून आणले. कारण, मोठा भाऊ आम्ही होतो आणि युतीधर्म पाळणं ही आमची नैतिक जबाबदारी होती. ती आम्ही पाळलीदेखील. अवघ्या १३ दिवसांच्या पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या त्या अल्पकालीन सरकारमध्येदेखील भाजप सोडून अन्य पक्षाचा एकच मंत्री होता आणि तो होता शिवसेनेचा.. इंडस्ट्री मिनिस्टर सुरेश प्रभू आमच्या साहेबांचा रुबाब आणि दरारा त्यावरून सगळ्या देशाच्या लक्षात आला. मात्र हे सरकार अल्पकालीन ठरल्यामुळे एक शिवसैनिक केंद्रात कॅबिनेट मिनिस्टर झाल्याचा आमचा आनंद देखील १३ दिवसांसाठीच टिकला. १९९८ साली भाजपच्या पुढाकाराने अखिल भारतीय पातळीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) स्थापना झाली. रालोआमध्ये शिवसेना हा भाजपचा अत्यंत जवळचा आणि महत्त्वाचा सहकारी होता. कारण, आमची युती वैचारिक होती. व्यापक हिंदुत्वासाठी होती. काँग्रेसमुक्त महाराष्ट्रासाठी होती. सत्ता आहे किंवा नाही याचा विचार साहेबांनी कधी केला नाही. भाजपची कायम पाठराखण केली. ‘केंद्रात तुम्ही आणि राज्यात आम्ही’ हे अलिखित समीकरण भाजप आणि सेनेत रूढ झालं. म्हणजे केंद्रात मोठा भाऊ, तुम्ही आणि राज्यात मोठा भाऊ आम्ही... असा एका अर्थी परस्परांच्या संमतीने व स्वखुशीने केलेला तो ‘नियतीशी करार’ होता. १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमचे ६ तर भाजपचे ४ उमेदवार आम्ही ‘मोठा भाऊ’ या नात्याने निवडून आणले. पण कोत्या मनाचे भाजपवाले हे कधीच मान्य करत नाहीत. असो, पण आमचे खासदार सुरेश प्रभू हे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. पुढे २०१४ साली याच सुरेश प्रभूंनी शिवसेनेशी गद्दारी करून भाजपची वाट धरली आणि केंद्रात मंत्रीपद मिळवलं. शिवसैनिक सत्तेसाठी आमच्याशी गद्दारी करू शकतो ही कल्पनाच मला सहन होत नाही. हरामखोर लेकाचे. याच १९९८च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची गिरगावात एक सभा झाली. या सभेला बाळासाहेब, लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, उद्धव ठाकरे उपस्थित होते. याच सभेत बाळासाहेब भाषणाला उभे राहिल्यावर शिवसैनिकांनी फटाके फोडायला सुरुवात केली. खूप वेळ गेल्यानंतरही फटाक्यांचा आवाज काही शांत होईना. शेवटी कंटाळून बाळासाहेब दोन्ही पायांवर खाली उकीडवे स्टेजवर बसून राहिले. बाळासाहेबांचा हा मिश्कीलपणा पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. असे होते आमचे साहेब. मिश्कील. समयसूचक आणि हजरजबाबी! महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळामुळे आम्हाला राज्यसभेत खासदार निवडून देण्याची सुसंधी लाभली होती. जुलै १९९८ मध्ये शिवसेनेकडून प्रीतीश नंदी राज्यसभेवर निवडून गेले. प्रीतीश नंदी यांचा टाइम्स ऑफ इंडिया आणि इलस्ट्रेटेड विकली या इंग्रजी वृत्तपत्र समूहांशी असलेल्या संबंधांमुळे आणि त्यांच्या इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे. रेम्या डोक्याचे भाजपवाले त्यांना ‘ब्रिटिश नंदी’ म्हणून ‘ते मराठी बोलतात का?’ असं खवचटपणे मला विचारायचे. त्यावर ‘हे तुमच्या बुद्धी बाहेरचे आहे’ असे सांगून मी त्यांना उडवून लावायचो. पण पुढे ‘ऑटो रायडर्स’चे मुकेश पटेल, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील राम जेठमलानी, व्हिडीओकॉनचे राजकुमार धूत शिवसेनेकडून राज्यसभेवर निवडून जाऊ लागले आणि भक्तगणांच्या टोमण्यांना ऊत आला. राम जेठमलानी यांनी कृष्णा देसाई खून खटल्यात शिवसैनिकांची बाजू मांडली होती आणि त्यांना फाशी होऊ दिली नव्हती. त्या उपकाराचे हे एका अर्थी ऋणमोचन होते. बाकीची नावं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी आयुष्यभर नररत्ने गोळा केली, तसेच आमचे साहेब करताहेत असे मार्मिक आणि खोचदार उत्तर मी देत असे. (तरीपण भक्तांचे कायम एकच तुणतुणं चालू असायचे. ‘मातोश्री’वर पेट्या पोचल्या असणार! अरे बिनडोकांनो, काहीतरी नवीन आरोप करा !) १९९९ च्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत आमचे १५ वाघ तर आमच्यामुळे भाजपचे १३ खासदार निवडून आले. केंद्रात शिवसेनेचे कॅबिनेट आणि राज्यमंत्री आपापली खाती रुबाबात सांभाळू लागले. केंद्रातील मंत्रीपदामुळे शिवसेनेचा बोलबाला सबंध देशात होऊ लागला. सुरेश प्रभू अनंत गीतेंपासून आनंदराव अडसुळांपर्यंत सगळे मंत्री शिवसेनेचा डंका चौफेर वाजवू लागले. आमच्या साहेबांच्या शब्दांवर वाजपेयी सरकार डोलत होते. मात्र, त्यानंतर १९९९ सालीच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दुर्दैवाने युतीची सत्ता गेली. १६१ जागा लढवून आमच्या ६९ वाघांनी डरकाळी फोडली तर कमळाबाईच्या ११७ पैकी ५६ उमेदवारांना आम्ही विजय मिळवून दिला. मोठ्या भावाचे कर्तव्य आम्ही चोखपणे बजावले. पण, धाकट्या भावाने कधी त्याची कदर केली नाही ही आमची कायमची सल आहे. काहीही असो... पण युतीची सत्ता गेली एव्हढं खरं. काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं. या निवडणुकीत साहेबांचा करिष्मा कमी पडला, की मराठी माणसाने आमच्याशी गद्दारी केली हेच मला कळेना. साहेबांचा करिष्मा कमी होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मराठी मतदारच नमकहराम निघाला, अशी माझी खात्री पटली. पण, याच दरम्यान शिवसेनेला एक सर्वोच्च सन्मान आणि ओळख मिळाली. लोकसभेचे सभापती बालयोगी यांचं एका हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि शिवसेनेचे मनोहर जोशीसर लोकसभेचे सभापती झाले. शिवसेनेचा डंका त्रिखंडात वाजू लागला. याच काळात शिवसेनेमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. साहेबांचे थोरले सुपुत्र उद्धवजी ठाकरे यांनी आपली राजकीय कारकीर्द २००२ मध्ये बृहन् मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे प्रचार प्रभारी म्हणून सुरू केली. या निवडणुकीत शिवसेनेचे ९७ नगरसेवक त्यांनी निवडून आणले.(आधीच्या सभागृहात तुमचे १०३ नगरसेवक होते. उद्धव ठाकरेंनी प्रचार केला आणि त्यातले ६ कमी झाले या अधूमेंदूच्या भक्ताडांच्या तर्काला ‘उद्धवसाहेबांचा हा पहिलाच प्रयत्न असूनही त्यांनी देदीप्यमान यश मिळवले’ हे बिनतोड उत्तर मी देत असे.) २००२ च्या गोध्रा कांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्याचा निर्णय जवळपास घेतला होता. पण, आमच्या साहेबांनी वाजपेयी- अडवाणींना ‘मोदी गया, तो समझो गुजरात गया’ म्हणून सज्जड दम भरला आणि मोदीजींची खुर्ची वाचली! आज मोदीजी बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे हे उपकार विसरले आहेत. इतिहास त्यांना माफ करणार नाही. जानेवारी २००३ मध्ये उद्धव साहेबांची शिवसेनेच्या महाबळेश्वरच्या अधिवेशनात बाळासाहेबांच्या अनुमतीने आणि राजसाहेब ठाकरे यांच्या अनुमोदनाने शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली. वाघाच्या पोटी वाघच जन्माला येणार, या न्यायाने उद्धव साहेब ठाकरे ही ठाकरे घराण्याची पुढची पिढी आता आमचे नेतृत्व करायला सज्ज होत होती. शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे नवे वारे वाहत होते. पण २००४ सालापासून शिवसेनेच्या चढत्या यशाला कोणाची तरी दृष्ट लागली. सत्ता म्हणून आणि पक्ष म्हणून आमची साडेसाती सुरू झाली. तो कोण अपशकुनी होता, तेच आम्हाला कळेना. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अल्पमतात आली. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार गेले आणि सत्ताही गेली. काँग्रेसचे डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. मात्र जन्माने विदेशी महिला असलेल्या सोनिया गांधी यांना पंतप्रधान होण्यासाठी साहेबांनी केलेला कडाडून विरोध आम्हा शिवसैनिकांना आणि देशातील जनतेलासुद्धा चांगलाच भावला. या निवडणुकीत आम्ही भाजपचे १३ खासदार निवडून आणले. पण, आमचे मात्र १२च वाघ जिंकले. तरीही मोठा भाऊ म्हणून आमचा रुबाब कायम होता. आमचा एक खासदार कमी निवडून आला म्हणून काय झाले? आम्ही त्यांचे १३ खासदार निवडून आणले होते. राज्यात ‘मोठा भाऊ’ आम्हीच होतो. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पेक्षा आमची युती काकणभर सरसच ठरली होती. दिल्लीतली सत्ता गेली तरी महाराष्ट्रातील सत्ता आम्ही खेचून आणू असा आम्हाला विश्वास होता. पण दैवाचे फासे उलट पडले. त्याच वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १६३ जागा लढवून आमचे ६२, तर १११ जागा लढवून भाजपचे ५४ आमदार आम्ही निवडून आणले. मात्र, बहुमत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला मिळाले आणि आमची घोर निराशा झाली. आमच्यासाठी दळभद्री कमळाबाई असून नसल्यासारखी होती. (क्रमश:)
Comments
Add Comment